Monday, 10 February 2025

हट्ट - राजश्री मानकर


हट्ट केला ध्रुवबाळाने मांडीवरी बैसण्याचा,

अढळपदी जाऊनीया आकाशात स्थिरावला।

हट्ट केला प्रभू रामाने चंद्रास मिळविण्याचा,

पाण्यात प्रतिबिंब दावूनी कौसल्येने तो पुरविला।

हट्ट केला सीतामाईने मृगाजिनाचा,

हट्ट पुरविण्यापाई रामायण ते घडले।

हट्ट असे पुराणातले

गोष्टीरूपे बालमना रिझविती।

लहानग्यांचे छोटे छोटे हट्ट मात्र,

पालकांना संभ्रमात बुडविती।

चॅाकलेटसच्या हट्टापायी दात किडण्याचे भय,

कितीही समजाविले तरी अश्रूंपुढे हात टेकण्याचे वय।

कपडे, खेळण्यांचे हट्ट तर नित्याचेच,

पुरवितांना होणाऱ्या काहीशा ओढग्रस्तीचेच।

हट्ट शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा,

मायेच्या स्पर्शांना पारखे होण्याचा।

हट्ट असा करावा की

दुखू नये कुणाचेही मन।

हट्ट पुरवताना समाधानाने 

फुलावे सभोवतालचे रान।


हट्ट - यशवंत देव

 एक छकुली घरात दिसते

आनंदात ती अशी रमते

खेळताना ती इकडे तिकडे

किती ती अल्लड दिसते


पाहताना रोज तिला मी

पाहतानाही हरवून जातो

म्हणते बाबा बाबा मला ती

त्या हाकेने किती सुखावतो


आईपाशी ती हट्ट करते

मला पाहता लपून बसते

ओळखता मी सर्वकाही

हट्ट पुरविण्या मन माझे रमते


अशी माझी गोड छकुली

एक दिवस मोठी होते

म्हणताना ती आईबाबा

येते म्हणूनी आम्हा सांगते


अशी छकुली जाताना

सांगून जाते डोळ्यांमधुनी

असली मी जरी छकुली

काळजी घेईन सर्वकाही


होईन आईबाबा आता मी

नका रडू जातानाही

असेल सोबत मी अशीही

जसे जपले छकुलीस तुम्हीही.............


                    

           

कट्टा - ऋग्वेद

 कट्टा म्हणा नाका म्हणा अड्डा म्हणा किंवा स्पॉट म्हणा 

कुणी काही म्हटल्याने फरक कुठे पडतो 

मित्र एका मित्राला तिथेच खरा भेटतो! 


कट्ट्यावर भेटू म्हणताना किती सिक्युअर वाटतं सांगू 

आई मात्र नेहमी म्हणते उगीच तिथे नको थांबू 


कसं सांगू आई तुला तिथे काय गंमत असते 

भरभरून बोलता येतं 

मन मोकळं करता येतं

कुणाचं हृदय जुळतं 

कुणाचं चक्काचूर होतं 

कुणी बोलूच देत नाही आई 

बाबांसारखा

कुणी समजून घेतो मनापासून 

तुझ्यासारखा


घरात कधीच कट्टा नसतो 

कट्ट्यावर मात्र घर असतं 


खरं सांगतो आई तुला 

कट्ट्यासाठी वाटेल ते 

तू सुद्धा ये तिथे 

तुला सुद्धा पटेल ते 


हो पण आई, आमच्या गप्पा ऐकू नकोस 

तुला भाषा झेपणार नाही 

आमच्या तसल्या नजरांमधला

तुला अर्थ कळणार नाही 


एक सांगतो आई तुला 

तू टेन्शन उगीच घेऊ नकोस 

यांच्यात राहून वाया जाईन

असं उगाच समजू नकोस


जिवलग असो वा परका असो

मित्र शेवटी मित्र असतो

मैत्री अधिक घट्ट असावी 

म्हणून फक्त कट्टा असतो


- ऋग्वेद

कट्टा -- सुनिता वैद्य

 कट्टा भावार्थचा

नित्य नवीन लिहिण्याचा

अन् नवे विचार मांडण्याचा


कट्टा सांगतो सगळ्यांना

लिहिते व्हा लिहिते व्हा 

मनातील भावनांना व्यक्त करा


उचलली लेखणी पटकन

लिहू लागले झटकन, अन् 

शब्द शब्द आले की ओघळून


बघता बघता व्यक्त झाले

वहीचे पान भरुन गेले

आणि काव्य माझे पूर्ण झाले...



प्रजासत्ताक - वनजा देव

 प्रजासत्ताक


ठरलेल्या दिनी ठरलेल्या वेळी,

नित्य पंरपरेने साजरा होतो एक देखणा सोहळा,

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा!

जवानांच्या नियोजनबद्ध कवायती,

विमानांच्या चित्तथरारक

हवाई कसरती,

बघणार्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकविती!

आकर्षक चित्रथातून दिसे

देशाची  सर्वांगीण प्रगती!

सामर्थ्य आपुले पाहून

अभिमानाने येई ऊर भरून!

विद्या -कला-शौर्याचा घडे येथे त्रिवेणी संगम,

प्रत्येक क्षेत्राचा होई उचित गौरव!

सलाम त्या वीरांना,

ज्यांच्यामुळे साजरा होतो

हा देखणा सोहळा!


            

अक्षर - शमिका

 अक्षर अक्षर जुळवून, तयार होतो शब्द,

शब्द शब्द जपून वापरा ,करू नका प्रतिशब्द!

शब्द शब्द जोडून तयार होते वाक्य,

वाचणाऱ्या चे ओसंडून वाहते औत्सुक्य!

वाक्या वाक्यांनी तयार होते कथा कादंबरी,

कवि लोकांना वाटते,ह्यापेक्षा कविताच बरी!

रात्रशाळेत करतात अक्षरओळख सर आणि बाई,

अंगठेबहाद्दर पण करू लागतात मग ऐटीत सही !

अशा ह्या अक्षराचा असतो मोठा थाट ,

मात्र अक्षरांच्या अदलाबदलीने पेशवाईत लागली वाट !

असा हा अक्षरांचा महिमा , खूप काही सांगून जातो,

आणि योग्य त्याच्या वापराने आपण सुंदर आयुष्य जगतो !


अक्षर - दुष्यंत देशपांडे , कराड

 अक्षर


अक्षर अक्षर जुळवून जेंव्हा 

          शब्द तयार होतो 

सुखदुःखाच्या गोष्टी तेंव्हा

           तो सांगून जातो !

 अक्षरानेच शब्द बनतो 

      आणि शब्दानेच भावना

 भावनेनेच एक एक उमलते

        गद्य पद्यातील संवेदना !

 उमटल्या ज्या मनात संवेदना

        कागदावरही उतरती 

सारा खेळ मग शब्दांचा

         हळुवार ते पाझरती !

 कोणी लिहिली सुखदुःखाच्या गोष्टी

          कोणी दुःखा वेग 

कोणी सांगती कर्म कहानी 

          कोणी संचित योग  !

अक्षरानेच उभे राहिले 

         शब्दांचे ते डोंगर सारे 

कांही नजरेत पाहू जाता

      दिसती अक्षरा विना ही काही अक्षरे !!



माझा - माधुरी केळकर

 मी,माझं, माझा ,माझी..हे सगळे शब्द  अधिकार ,

possessiveness दर्शवतात.

आपल्या अगदी बाल्यावस्थेतच या शब्दाची ओळख  होते.आवडीच  खेळणं,वस्तूला कुणी हात जरी लावला,किंवा आपल्या आईच्या कडेवर दुसर्‍याच बाळाला बघितलं तर रडून ,ओरडून निषेध  व्यक्त केला जातो....हे माझं आहे हे सांगितलं जातं.

 आवडलेली कुठलीही गोष्ट 

माझं..माझं करून कुणालाही दिली जात नाही. 

 ' माझा होशील का ' असं वाटत असताना हे वाटणं प्रत्यक्षात  आलं तर मग 'तुझं..माझं' न राहता 'आपलं 'होऊन जातं ,आणि  यात सर्वसमावेशक  भाव असतो.

  वयाची साठी ओलांडताना

बर्‍याच  जबाबदाऱ्या  पार पडलेल्या असतात. या टप्प्यावर ' इदं न मम '

ही जाणीव खरंतर हवी ,पण...माझं..माझं करत कवटाळून  बसलो तर संघर्ष  अटळ असतो.

    तेव्हा , वेळीच मनाला आवर घाला..निरिच्छ  होऊन अलिप्त  व्हायला शिका.

    माझं..माझं न करता 'इदं न मम ' म्हणा आणि  उर्वरित  आयुष्य सुखात समाधानात घालवा.

     

श्वास - वनजा देव

 होता दोन श्वासांचे मिलन

एक नवा श्वास घेई जन्म!

ते दोन श्वास प्रेमाने देती

निज श्वासातला श्वास ,

भरविती घासातला घास,

नवा श्वास वाढे  दिन मास!

शेवटच्या श्वासापर्यंत मायबाप ते उभे राहती लेकरापाठी,

श्वास त्यांचा अडे काळजीपोटी!


श्वास मिळाले किती कुणाला,

किती खर्चले,उरले किती,

हिशेब सारा ठेवे तो जगज्जेठी!

प्राप्त  श्वास जे आले हाती,

लागावेत सत्कारणी!

घेता यावे काही श्वास देशासाठी,

थोडे देता यावेत समाजासाठी!


जगण्यासाठी श्वास आवश्यक

परी त्या श्वासासाठी झगडणे नको!

स्वतःचे संपता,कृत्रिम श्वासावर जगणे नको!


वेळ न कोणी जाणे अंतिम श्वासाची 

नसे स्थानाची निश्चिती!

पण तो श्वास असावा

आनंदाने निरोप घेण्याचा,

कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचा,

ज्या दोन श्वासांनी दिधले जीवन,

त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा!


             

तू -अवधूत कुलकर्णी

 येथे नको विसावू, तेथे नको विसंबू

सांभाळ शूरवीरा, तू आपुलाच तंबू


आषाढमेघ यावे, थेंबाविना सरावे

वायाच संगरी का, हे दुंदुभी नि कंबू ?


पंख्याविना विमाने होती म्हणे पुराणी

वैज्ञानिकां विचारा, आता कुठेत चंबू


“जिंकाल विश्व सारे”, सांगे हरेक जोशी

सांगेल का कुणी हो, भावी विधा-विचंबू 


फिर्याद फाळणीची सीमेवरी कुणाची

शोधूनही मिळेना, कसला गुन्हा-गजंबू 


           

तू - छाया राजन पाडलोसकर

 तू येतो आणिक....


गेलास तू परतुनी परदेशी अन

भिंती घराच्या झाल्या अबोल

प्रत्येक वस्तू आहे जणू स्तब्ध

या शांतीचे न वाटे मजला मोल


आई आई म्हणून मारलेली हाक

कानात घालीत असे सदा गुंजन

तुम्हा आवडीचे खाऊ घालण्यात

होत होते माझ्या मनाचे रंजन


लाभला सहवास मोठा तुझा

घरात होती सारखी गजबज

आत्या, काका, काकी अन

छोट्या भावंडांची होती लगबग


दादा वहिनी आले म्हणून सारी

भावंडे होती भारीच खुशीत

हास्य विनोद मौजमजेसह होती

खवय्येगिरीचा आनंद लुटीत


तुमच्या येण्याने साजरा झाला

प्रत्येक दिवस म्हणजे जणू सण

मित्रमंडळी,नातेवाईकांनी चढविले

त्या दिवसांना आनंदाचे कोंदण


'तू येते आणिक जाते' भाव हे

त्या गाण्यातील आज मज आठवती

फुलापरी उमलणाऱ्या त्या दिसांच्या

आनंदी कळ्या कायम आम्हां स्मरती


उद्यापासून होणार आता जरी

तुमची मोबाईलच्या स्क्रीनवर भेट

आहे आम्हापाशी तुम्ही ठेविलेले

अमूल्य असे आनंदी क्षणांचे हे बेट



मोह - शर्वरी जोशी

 सावर सावर अंबाबाई

सावर सावर अंबाबाई संसाराचा 

घोळ ग

संसाराचा घोळ ग, मनीचा हलकल्लोळ ग...

भवसागरी या पोळतो जीव

दिखाउपणाचे चहूकडे पेव

धावलो किती तरी भेटेना देव

सर्वत्र माजला गोंधळ ग

सावर सावर अंबाबाई.......

फाटक्या तुटक्याचा जमवुनी संसार

भावभावनांचा त्यामध्ये वावर

मन जेव्हा होई कातर

 प्रेमळ शब्दा जीव अधीर पण..

 कोरडाच मिळतो धीर ग..

सावर सावर अंबाबाई संसाराचा 

घोळ ग......

कित्ती जमा तरी लालसा तूटेना

अर्थ हव्यास मिटता मिटेना

संसाराची गाठ अविट सुटेना

माया मोह कसा टाळू ग ....

सावर सावर अंबाबाई .......

नात्या गोत्यांचा एवढा ढिगारा

एक ना धड चिंध्या भाराभरा

मान  सांभाळा,मन आवरा

आपल्या मताला नाही थारा ग ...

सावर सावर अंबाबाई 

संसाराचा घोळ ग 

संसाराचा घोळ ग...

मनीचा हलकल्लोळ ग....


मोह - अर्चना मोहोळकर

 घरच्या अंगणात 

प्राजक्ताचा सडा पडला 

ओंजळीत घेऊनत्याच्या 

गंधाने मन भरून घ्यायचा 

'मोह' मला झाला 


रांगत आलं चिमुकलं बाळ 

त्याच्या पायीचा वाजे वाळा 

नादाने त्या भारावले मी 

उचलून घ्यायचा 'मोह' मला झाला 


 आजीचा मऊशार रेशमी 

हात चेहऱ्यावर  फिरला 

स्पर्शाने  त्या मोहरले मी 

"मोह"मिठीचा झाला 


राऊळातले रूप सावळे 

मोरमुकुट पितांबरधारी

रूपाने मज वेड लावले 

मोहातच मी गुरफटले  पुरी 


शब्द स्पर्श  अन् रूप गंध  

मोहविती मजला जरी 

विवेक म्हणतो सांभाळ जराशी

नीरक्षीर मनाशी करी 


संक्रांत - धिरज विलासराव कुलकर्णी नांदगावकर

 ,तिळगुळ घ्या गोडगोड बोला


मनाने मनाला समजून घ्यावे

इतरांबद्दल ममत्व असावे


कोणाची निंदा नालस्ती नको

कोणाला कमी लेखणे नको


मिळालेल्या क्षणाचा आनंद उपभोगावा 

भांडणंतंटा अबोला सोडून द्यावा


करुणा सागर ईश्वराचे मानावे आभार

मानव जन्म देवून केले मोठे उपकार


नात्यांचे बंध जपावे मैत्रीच्या धाग्यांनी

जीवनरुपी नौका पार करावी सामर्थ्यानी


गुळासारखी गोडी तीळासारखी माया 

सद्गुरुंचा आशीर्वाद देवाची छाया

 

कमलसुताचे सर्वांना हेच मागणे

तीळ गूळ घ्यावे ठेवावे गोड बोलणे


तिळगुळ घ्या गोडगोड बोला 



संक्रांत - वनजा देव

 मार्गशीर्ष संपता संपता घराघरांतून तीळ,दाणे  भाजल्याचे ,पोळीसाठी केलेल्या गुळाचे वास यायला लागले की पूर्वी संक्रांत जवळ आल्याचे समजायचे.खूप हौशी गृहिणी पांढराशुभ्र काटेरी हलवा घरी करायच्या.मंद निखार्यावर परातीत थोडे थोडे तीळ परतत ,त्यावर चमच्याने साखरेचा पाक टाकत हलवा करणे हे फार कौशल्याचे, वेळखाऊ व चिकाटीने करण्याचे काम करण्यात बायका निपुण होत्या आणि काहीजणी त्यावर थोडेसे अर्थार्जनही करत.बाळाचे,नवविवाहितांचे दागिने घडविण्यासाठी फुटाणे,खसखस,बदाम,

शेंगदाणे असा विविध प्रकारचा हलवा बनवून तर्हेतर्हेचे लहान मोठे दागिने बनविण्यात मुली स्त्रियांचा हातखंडा असायचा.आजही दुकानांमध्ये महिनाभर आधीपासून विक्रीसाठी दागिने ठेवण्यासाठी 3-3 महिने तयारी चाललेली असते कारण पूर्वी जो सण घरातल्यांनी हौसेने साजरा करायची पद्धत होती,त्याला दिखाव्याचे स्वरूप आले आहे आणि उत्तमातले उत्तम  हलव्याचे दागिने खरेदी करण्यासाठी लोक पैसे मोजण्यास तयार आहेत.

संक्रांत म्हणजे गुळाची पोळी हवीच आणि ती उत्तम करता येणं,ही पण एक कसोटी आहे.आता गुळाच्या पोळ्या,पोळीचा गूळ आणि तिळगूळ सारंच विकत मिळत असल्याने सणाची अशी काहीच गडबड नसते.

अन्य सणांप्रमाणेच  संक्रांतीचेही वैशिष्ठ्य आहे.ह्या ॠतुत एकूणच भाजीपाल्याची रेलचेल असते.त्यामुळे भोगीच्या भाजीतल्या सर्व शेंगा,ओला हरबरा,गाजर,वांगी ,वगैरेची एकत्र  भाजी,थंडी असल्यामुळे बाजरीची भाकरी,लोणी मुगाची खिचडी,साजुक तुपासह

 गुळाची पोळी, असा आरोग्यदायी आहार म्हणजे पंचपक्वान्नही मागे पडतील.आपल्या प्रत्येक सणाचा आहार हा ॠतुनुसार,हवामानानुसार आणि त्या काळात उपलब्ध असणार्या गोष्टींनुसार ठरतो.संक्रांतही त्याला अपवाद नाही.

रथसप्तमीपर्यंत चालणारे हळदीकुंकु आणि लुटायच्या वस्तू हेही एक संक्रांतीचे आकर्षण असते. लुटण्यासाठी प्लॅस्टीकच्या असंख्य लहान मोठ्या वस्तूंनी बाजारपेठा फुललेल्या दिसतात.

पर्यावरणाचा र्हास करणारी वस्तू हातात आली की वाण म्हणूनही घ्यायला मला तरी नकोसं वाटतं.फार पूर्वी लुटणं,म्हणजे शेतातला भाजीपाला,ऊस,हरबर्यच्या पेंढ्या वगैरे एका कोपर्यात रचून ठेवलं जायचं आणि त्यातून प्रत्येकीने जे हवं ते घ्यायचं,अशी पद्धत असल्याचे माझे वडील सांगायचे.आता ते शक्य नाही,तर मूठभर धान्यचं लुटावं.हे विचारांचं संक्रमण कधी आणि कसे होणार?

घरात,आपापसात संवादच नाही,तर गोड बोलणं दूरच राहिलं.आता उद्या मिनिटामिनिटाला संक्रांतीच्या शुभेच्छांचे मेसेज येतील.म्हणतात ना"बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी"तशी परिस्थिती आहे.

संक्रांत हा एकच सण आहे जो खगोलशास्त्राच्या निकषांवर आपण साजरा करतो.त्यामुळे ती तारीख कधी बदलत नाही,तिथी मात्र दरवर्षी वेगळी येते.

तरीही परंपरेने त्यात ऋतुनुसार खाद्यपदार्थांची,

काळ्या रंगाच्या वस्त्रांची,

हलव्याच्या दागिन्यांनी बाळाचे,नवविवाहितांचे कौतुक करण्याची,अशा सण साजरा  करण्याच्या अनेक प्रथा आहेत.पण सध्या वेळेअभावी आणि पैसा जास्त असल्याने अन्य सणांप्रमाणेच त्यातला मूळ गाभा हरवत चालला आहे.हलवा गोड असला तरी त्याला काटे असतात.पूर्वी वडिलधार्या माणसांच्या बोलण्यातले तीव्र शब्द काट्यासारखे टोचणारे असायचे,हे खरं आहे.पण त्यामागे काळजीचा,प्रेमाचा,गोडवाही असायचा,हे विसरता येणार नाही.

नविन वर्षाचे संकल्प करून पंधरवडा उलटेपर्यंतच संक्रांत येते.तेव्हा वरवरचं,औपचारिक नव्हे,तर खरोखरच गोड बोलण्याचा,पर्यावरणाची काळजी घेऊन वस्तू लुटण्याचा संकल्प केला,तर विचारांचं संक्रमण झालं,असं म्हणता येईल.


          

भाव - सौ.लता बापट

 शब्दांच्या आतिशबाजीत हरवून जायचं नसतं

बरोबर आहे सखये 

पण शब्द तर हवेच असतात ना ग 

अलंकारिक नटलेले....

त्या शब्दांनीच तर फुलोरा फुलतो 

भावनांना बहर येतो 

आतिषबाजीत हरखून जाणे असते नयनांचे 

अन् शब्दांनी हरखून जातात 

भाव हृदयीचे 

काही क्षण मन तरंगत असतं 

हरवून जातं 

एक लक्षात असू दे सखये 

भानावरही ते क्षणात येतं 

मैत्र जेंव्हा जागृत असतं 

शब्दांच्या आतिशबाजीत हरवून जायचं नसतं

बरोबर आहे सखये 

पण शब्द तर हवेच असतात ना ग 

अलंकारिक नटलेले....

त्या शब्दांनीच तर फुलोरा फुलतो 

भावनांना बहर येतो 

आतिषबाजीत हरखून जाणे असते नयनांचे 

अन् शब्दांनी हरखून जातात 

भाव हृदयीचे 

काही क्षण मन तरंगत असतं 

हरवून जातं 

एक लक्षात असू दे सखये 

भानावरही ते क्षणात येतं 

मैत्र जेंव्हा जागृत असतं 



भाव - शर्वरी जोशी

 माणसासारखं वाग

बघ बाळा जग चाले जरी

पैशासाठी आज!

एक लक्षात ठेव तू मात्र चांगल्या मांणसा सारखा वाग....

 पैसा महत्वाचा आयुष्यभर

 तो जपायलाच लागतो

पण आपल्या माणसासाठी कधी 

सोडूनही द्यावा लागतो

आज सोडतोय उद्या मिळविन 

मनगटावर ठेव विश्वास...

पण माणसाशी मात्र नेहमीच बाळा

माणसासारखं वाग....

मोठया माणसाला मान बाळा 

नेहमीच द्यायला हवा

पण विचाराच्या बदलांचाही

विचार करायलाच हवा

काय योग्य काय अयोग्य

गुंता सोडवणं पडतच भाग

पण लक्षात ठेव माणसाशी नेहीमी

मांसासारखच वाग....

ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो

ज्याचे त्याचे विचार

कुणाला किती द्यायचं म्हणत्व 

ठरवावच लागतं  यार....

थोडासा विवेक असला की 

सगळं पडतं नीट पार

तू मात्र माणसाशी माणसासारखंच वाग.....

मोठेपणा, अभिमान बाळगू नको जास्त 

खरं नात आपलं आपल्या मातीशीच असतं  

 त्या त्या वेळच्या परिस्थितीवर सगळं ठरत असतं 

कोणी वाईट म्हणालं म्हणून नेहमी तसच नसतं !

 विवेक बुद्धी जागी ठेऊनच द्यावा दुसर्यांना भाव 

पण बाळा माणसाशी नेहमी माणसा सारखंच वाग

योग्य वेळीच योग्य गोष्ट करण्यासाठी वाक

गरज नाहिये कुणाला 

तर दुरूनच बघ ...

कामात असलास तरी 

माणुसकीच्या गरजेला जाग..

माणसाशी नेहमी बाळा माणसासारखं वाग.... 


कृष्ण - राजश्री मानकर

 युगंधर-श्रीकृष्णास


गेल्या अनेक हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण या नावाचे गारूड सगळ्यांनाच प्रेमात पाडते आहे.त्याचे भक्त राधेकृष्ण म्हणत त्याचा जयघोष करीत असतात. खरतर राधा ही कृष्णाच्या बालपणातली त्याची सखी. कृष्णाने गोकुळ सोडल्यावर त्यांची परत कधी भेटही झाली नव्हती. गोकुळ सोडतांना मात्र तिने दिलेली वैजयंती फुलांची माळ आणि बासरी (मुरली) या दोन गोष्टी मात्र कृष्णाने सतत जवळ बाळगल्या. राधा या शब्दाचा अर्थ रा म्हणजे लाभो किंवा मिळो आणि धा म्हणजे मोक्ष किंवा जीवनमुक्ती. राधेकृष्ण म्हणजे त्याचे भक्त मोक्षाची मागणी करतात. श्रीकृष्णाचा जीवनप्रवास खरतर कळायला तितका सोपा नाहीये. त्याने जीवनाचे तत्वज्ञान जे अर्जुनाला कुरूक्षेत्र लढाईपूर्वी सांगितले तेच भगवत गीता. यातील विचार हे पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरक आहेत. जे आजही भक्तीभावाने अनेकजण अभ्यासतात, समजून आचरणात आणण्याचा प्रयत्न ही करतात. पण किती लोक? तर फारच थोडे. माणूस जसजसा प्रगती करत गेला तसतसे प्राचीन संस्कृती, विचार हे काहीसे मागे पडत चाललेत. खरतर आजकालच्या आधुनिक विज्ञानात जे शोध लागतायेत त्याविषयी आपल्या पुराणांत, वेदांत ही लिहीलेले सापडते आहे. मुळात संस्कृतीची, विद्वत्तेची महती जाणून घेण्यात आपण कमी पडतोय. असो. तर आज मला सांगायचे आहे ते फक्त श्रीकृष्णाविषयी. आपली कृष्णाशी पहिली ओळख होते तीच मुळात चालता-बोलता यायला लागले की लगेच. बहुतेक आया आपल्या मुलाला कृष्णासारखा पितांबर नेसवून, डोक्यावर मुकुट ठेवून, त्यात मोरपीस खोचून, हाती मुरली देवून त्याच्या त्या गोंडस देवस्वरूपातला एक तरी फोटो काढून घेतात आणि मग वर्षानुवर्षे ते कृष्णाचे रूप आपल्या मनाच्या गाभाऱ्यात पूजत असतात. मग आपण शाळेत जाऊ लागलो की कृष्ण पराक्रमाच्या कथा जणू आयुष्याचा अविभाज्य भाग बनून आपली सोबत करतात. शाळेत मग भगवत गीतेमधील अध्याय ही म्हणायला शिकविले जाते. पाठांतराच्या स्पर्धा होवू लागतात. त्या श्लोकांचा अर्थ त्या वयात कळत नसतो पण तरीही हे काहीतरी महान ज्ञान आहे याची जाणीव मात्र नक्कीच होते. मग महाभारतातील अनेक कथांमधून कौरव, पांडव, पितामह भीष्म, गुरू द्रोण, कर्ण, कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, शकुनी इ. अनेक व्यक्तीरेखांशी ओळख होते परंतु मनात अढळपदी विराजमान होतो तो फक्त श्रीकृष्णच. कालीया मर्दन कथा,  कंसवध कथा, पुतना राक्षशिणीची कथा, गोवर्धनपर्वत कथा इ. अनेक गोष्टींमधून कृष्णाचे वेगळेच रूप मोहिनी घालते. तो प्रत्यक्ष देव जरी असला तरी मानवरूपात त्याने कृतीतून केलेले ते प्रबोधन होते. गोकुळात असतांना तोही सवंगड्याबरोबर खेळणे, खोड्या काढणे, गुरे राखणे हे सगळे करतच होता. पण संकटप्रसंगी युक्तीने कसा मार्ग काढायचा याची शिकवण ही वेळोवेळी द्यायचा. जितक्या सहजपणे त्याने गोकुळ, मथुरा, द्वारका या प्रत्येक ठिकाणचा त्याग केला हे पाहून वाटते अरे कशातही गुंतून पडू नये हेच तर त्याला सुचवायचे असेल का? मोह, माया या सर्वांतून अलिप्त रहाणे हाच खरा मोक्ष मार्ग आहे का? त्याच्या जवळच्या व्यक्ती म्हणजे पत्नी, मुले, सखे , नगरवासी या सगळ्यांवर त्याने जीवापाड प्रेम ही केले आणि अंतिम समयी कुणालाही न सांगता सगळ्यांचा सहज त्याग करून वनांत ही गेला.(भालका तीर्थ) जिथे एका व्याधाचा बाण लागून त्याचा मृत्यू झाला. कार्यभाग साधल्यानंतर सगळ्यातून बाहेर पडणे खरेच इतके सोपे असते का? द्वारका ही सुवर्णनगरी त्यानेच वसविली परंतु तो ना सिंहासनावर बसला ना युवराज म्हणून मिरवला. थोरलाबंधू बलराम, शेवटपर्यंत साथ देणारा उध्दव, सेनापती सात्यकी, त्याच्या गरूडधव्ज रथाचा सारथी दारूक, सखी द्रौपदी, भगिनी सुभद्रा, अभिमन्यू, अर्जुन या सर्वांवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांच्या सुखदुःखात समरस होवून सारे काही निभावून नेले. त्याच्या जीवनप्रवासात थोडी का संकटे आली? पण सगळ्यांना त्याच्याविषयी विश्वास होता काहीही झाले तरी तो यातून मार्ग काढील. सांज ये गोकुळी ,सावळी सावळी हे गीत ऐकतांना आधी फक्त भान विसरून ऐकावे असे वाटायचे पण श्रीकृष्णाविषयी अधिकाधिक वाचत गेले आणि मग त्याचे ते निळे सावळे गोकुळातील प्रसन्न रूप मनःपटलावर ठसा उमटवू लागले. बालपणी त्याने यशोदामातेला विश्वरूपाचे दर्शन मुखात घडविले या प्रसंगानंतर तर त्याच्या देवत्वाची छाप हळूहळू कळू लागली. त्याच्या पराक्रमाच्या तर अनेक कथा वाचल्या, ऐकल्या पण स्रियांविषयीचा आदर, सन्मान हा त्याने कृतीतून लोकांच्या मनावर बिंबविला होता. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्याच्याकडे सुदर्शन चक्राची अचाट शक्ती होती पण ती त्याने कधी ऊठ सूट वापरली नव्हती. शिशुपाल हा त्याचा आतेभाऊ, त्याला मारण्यापूर्वी त्याने दिलेला शब्द पाळला होता- जेव्हा याचे १०० अपराध होतील तेव्हाच मी याला ठार मारीन. या उदाहरणावरून तर कुठल्याही प्रसंगी संयमाने कसे वागावे याचा जणू त्याने पाठच घालून दिला नाही का? कौरव पांडवांमधील कुरूक्षेत्रावरचे महायुध्द हे जरी पांडवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढले गेले होते तरी त्यामुळे झालेला विनाश हेच दर्शवितो की भावाभावांमधला सत्तेसाठीचा हव्यास हा विनाशकारीच असतो. या युध्दात श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते. सारथ्य फक्त रथाचेच नाही तर विचारांचे, जीवनाचेही. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, कर्ण, पितामह भीष्म या साऱ्यांची योग्यता तो जाणून होता. कुणालाही न दुखावता योग्य निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते पण ते ही त्याने लीलया केले होते. सांदीपनींच्या आश्रमात एकत्र शिकत असतांना गरीब सुदामाशी केलेली मैत्री त्याने शेवटपर्यंत निभावलीच पण सुदाम्याला कमीपणा वाटू नये याची ही काळजी घेतली. अशा अनेक प्रसंगांमधून त्याला जी शिकवण द्यायची होती ती त्याने कृतीतून जगासमोर मांडलीच होती. हे सारे समजण्याची कुवत मात्र ज्याची त्यानेच ओळखायला हवी. आपल्या भक्तांच्या हाकेला तत्परतेने तो धावून येतोच फक्त श्रध्दा मात्र हवी. त्याने हे ही सांगून ठेवले आहे की जगाला गरज असेल तेव्हा प्रत्येक युगात कुठल्या ना कुठल्या अवतारात येवून जगाचा उध्दार नक्की करेल. सध्याचे युग तर कलियुग आहे. भ्रष्टाचार, दुराचार, दांभिकता, बलात्कार यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतांना दिसतायेत. हे श्रीकृष्णा हे सारे तर तूही पहात असशीलच पण तू योग्यवेळेची वाट पहात असणार. तरी रहावत नाही म्हणून विचारते- महाभारत काळी तुला एकट्या द्रौपदीला वस्त्रे पुरवावी लागली पण कलियुगात कित्येक अबलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर  टांगली जातायेत त्यांना वाली कोण? सत्तेसाठी, पैशासाठी माणूस माणसालाच ओळखेना झालाय यांना वठणीवर आणणार कोण? अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया घडतांना दिसतायेत, त्यांना आळा घालून शांतता प्रस्थापित करणार कोण? जात-धर्मातील तेढ माणसांना विनाशाकडे घेवून जाते आहे, यांना थोपवणार कोण? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुझ्याशिवाय का मिळणार आहेत? गीतेत तू जे जीवनाचे सार सांगितले आहे, जे योग सांगितलेत ते तू पुन्हा अवतार घेवूनच साऱ्यांना समजावून सांगायलाच हवेत. सत्ययुगाचे जर निर्माण व्हायचे असेल तर हे सारे तुलाच करायला हवे ना? तेव्हा आता घे लवकरच मनावर. शेवटी एकच मागणे-

द्वार दया का जब तू खोले,

पंचम सूर में गूंगा बोले।

अंधा देखे, लंगडा चलकर पहॅंुचे काशी रे।

दर्शन दो घनश्याम मेरे ,

मोरी ॲंाखियॅंा प्यासी रे।

  ओम श्रीकृष्णार्पणमस्तु।


कृष्ण - अस्मिता देशपांडे

 कृष्ण


यशोदेचा नंदलाला

करी नवनीत चोरी

मित्रांसवे करी काला

कृष्णसखा गिरीधारी..…


राधेसंगे रास खेळे

पावा वाजवी मुरारी

कंसनिर्दालन करी

कृष्णसखा गिरीधारी.....


द्रौपदीची लाज राखी

पांडवांची रक्षा करी

रणांगणी  गीता सांगे

कृष्णसखा गिरीधारी......


तत्वज्ञान गीतासार

संसाराला पार करी

अद्वैतापर्यंत नेई

कृष्णसखा गिरीधारी...


फक्त ..........

कृष्णसखा गिरीधारी

   

   

सखी सांजवेळी - विद्याधीश

 सखी सांजवेळी

(वृत्त : भुजंगप्रयात)


सखी सांजवेळी, रवी अस्त होता

क्षणी मूक होता, पसारा दिशांचा

नको लाजुनी तू, अशी गोड हासू

नको रक्तिमा लेवु गाली नभाचा


सखी सांजवेळी, नभी खेळ चाले

खगांचे थवे गात येता घरास

नको मुग्ध वीणेपरी गीत गाऊ

नको येउ ऐशी अवेळी भरास


सखी सांजवेळी, अशा गूढ काळी

घुमे वात निःशब्द जेव्हा दरीत

नको धाव घेऊस खोट्या भयाने

नको क्लांत होऊन येऊ मिठीत


सखी सांजवेळी, दडे शुक्र तारा

— तुला पाहुनी. सावळी तारका तू

नको सांज त्याची हिरावून घेऊ

नको तेज त्याचे असे झाकळू तू


सखी सांजवेळी, झरे मंद धार

भरे कस्तुरीचा सभोती सुगंध

नको लाजवू त्या सुगंधास ऐशी

फुलोनी नको येउ ऐशी सगंध


सखी सांजवेळी, तुझा हात हाती

धरोनी पहाता तुझ्या लोचनात

नको खोल डोहात खेचुन घेऊ

नको अमृताचे गडे पाजु घोट



सांज - स्नेहल.

 कुठे गर्द रानी

सूर्यास्त दिसावा

अशा सांजवेळी 

धुके दाटले


शोधण्या जे निघालो

ते न मिळता तरीही

रिकाम्या च हाती

मी परतलो


घ्यावे म्हणता भरुनी

न मावेल इतके

रिकामीच ओंजळ 

भरुनी, धुके वेचलो


स्तब्ध व्हावे क्षणांनी

ना दिन हा सरावा

इथेच विरावा,असा

उभा राहिलो


शोधण्या जर निघशील

आठवणीत माझ्या

इथेच विरून मी

भरून राहिलो....

अन् उरून राहिलो.....


 

तिन्ही सांजा - प्रज्ञा कोरडे

 तिन्ही सांजा


सळसळ पिंपळावरून 

ऊन उतरलं खाली 

सोनवर्खी आंगण 

दिसू लागलं भरजरी 


भरजरी अंगणाला 

किरणांची नक्षी 

उडून जातील दूर 

पांढऱ्या उन्हाचे पक्षी


सांजेच्या रंगांची 

क्षितिजावर दाटी

धुसर काळोख धरून

रात्र उतरेल पाठी


तिन्ही सांजा अशा

दारात लागतील विसावु

कातर कातर मन मग 

लागेल काही बाई आठवु


सुटलेले काही थोडे 

सांधायचे होते 

तिन्ही सांजा होण्याआधी 

जगायचे होते 


स्वर - राजश्री मानकर

 स्वर

स्वरांची दैवी देणगी लाभलेल्या अनेक महान व्यक्ती आपल्या सर्वांच्याच आवडीच्या, आदरणीय असतात. मंगेशकर घराणे तर सरस्वतीचा वारसा लाभलेले. लता दीदी असोत, आशाताई असोत, उषा ताई असोत, प्रत्येकीच्या गळ्यातल्या स्वराचे सामर्थ्य वेगळे. रसिकांना मात्र सगळेच स्वर भावणारे, रिझवणारे. एकासारखे दुसरे नाही तरी प्रत्येक स्वर हा भुरळ घालणाराच. कुणाचा स्वर सुगम संगीतासाठी चांगला लागतो, कुणाचा स्वर शास्त्रीय तानांमधे फिरतो, कुणाचा स्वर भूपाळ्या, स्तोत्रांमधे निनादतो, कुणाचा स्वर लावणीवर ठेका धरायला लावतो तर कुणाचा ईश्वर आराधनेत तल्लीन करतो. किती हे स्वरांचे वेगळेपण आणि हे दैवी देणे लाभलेले किती महान कलाकार , जे आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. भीमसेनजींच्या भूपाळ्यांनी अगदी देवालाही जाग येत असेल. सुबलक्ष्मींची स्तोत्रे किती गोड आळवणी करणारी, किशोरकुमार, मोहम्मद रफी यांच्या  स्वरांची जादू रसिकमनांवर सतत गारूड तर करतेच पण त्यांनाही कायम स्मरणात ठेवते.आशा खाडीलकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित यासारख्यांचे शास्त्रीय संगीत ऐकत रहावे असेच असते. जरी शास्त्रीय संगीत कळत नसले तरी त्यांची मेहनत, रियाज यांतून स्वरांचे महत्व मोहित करतेच. सुमन कल्याणपूर यांचा सुगम संगीताचा स्वर कोणी विसरू शकेल?  आजच्या तरूण पिढीला आवडणारे ते रॅप संगीत हे पण स्वरांचे वेगळेपण जपणारेच. कुणाला काय आवडेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण कुठल्याच स्वरांनी प्रभावित होत नाही असा मात्र कुणी नसेल. अगदी सकाळचे फिरणे असो, व्यायाम असो, गृहिणींचे घरातील काम असो, स्वरांची सोबत असेल तर कसे सगळे जोशात पार पडते. आपले जीवनच स्वरांनी इतके व्यापून आहे की भावना प्रदर्शित करण्याचे ते एक माध्यमच आहे. स्वर फक्त गाण्यातच लागतो असे नाही तर अनेकांचा बोलण्याचा स्वर, शैली ही समोरच्याला खिळवून ठेवणारी असते. एखादा वक्ता जेव्हा व्यासपीठावरून बोलत असतो तेव्हा स्वरातील चढउतार, आवेश ही त्यांची जमेची बाजू असते. बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे ही काही उदाहरणे सर्वांना माहित असतात. या व्यक्ती बोलू लागल्या की प्रेक्षक तल्लीन होवून त्यांचे स्वर , शब्द मनात साठवून ठेवीत असत. आपले बोलणे नेहमी गोड असावे, कुणाच्याही मनावर उमटू नयेत चरे असे आपण जे ऐकत असतो ती स्वरांचीच तर जादू. पण ज्यांचे देवाने स्वरच हिरावून घेतले आहेत त्यांना काय वाटत असेल ही कल्पना ही फार क्लेशदायक आहे.  तरीही त्यांचे आनंदाने जगणे पाहिले की वाटते - ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.


स्वर - शुभांगी तपस्वी

घनमाला निळ्या सावळ्या डोंगर माथ्याशी थबकल्या...जलदीने जलधारा

रिमझिम बरसल्या...नाचरे निर्झर धावत सुटले...घुंगुर वाळ्यांचे स्वर आसमंती निनादले...

घाट माथा सरसर उतरले...भिजल्या मातीतून गंध दरवळला...

जलवंती रंगात मृण्मयीच्या रंगली.. दोन्ही काठांवर स्वरलता हिरवीगार सजली... बालिका वधू जराशी लाजली... वळण वाटांनी मुरकत चालली...घाटदार घाटाने पात्र तिचे विस्तारले...तरंग लाटांवर हलकेसे उठले...वार्‍यासंगे खेळण्यात तनमन गुंतले...

झुळूक स्पर्शाने रोम रोम मोहरला... थेंबोथेंबी जलकण आनंदाने उसळला...

लहरींचे लहरणे लाटांवर शहारले...मृदुल  करांनी जलतरंग छेडले...नाद मधुर कंकंणातून तुषार कण ओघळले...

आरसपानी सौंदर्य प्रतिबिंबीत झाले...आकाशी आकाश जळावर भाळले...आभाळातून थेट गाभार्‍यात पोहोचले...खोल अंतरंगाशी त्याने संधान सांधले...

मनाचा थांगपत्ता आभाळा गवसला...

नदीच्या मुखातून झंकार उमटला...

सागरा भेटावया प्राण आतुर झाला...

मिलनाचा क्षण समीप आला...अधीर मनाचा बांध फुटला...सागराशी एकरूप होता...जलौघ धन्य धन्य झाला...

जलचक्राचा खेळ खेळण्यात सृष्टीकर्ता रमा रमण रमला!!!




स्नेह - वनजा देव


मैत्रीच्या पायर्या चढताना

पहिली पायरी परिचयाची,

दुसरी पायरी ओळखीची!

जुळतात त्यातून काही घट्ट मैत्र,

काही होतात नकळत त्रयस्थ!

मैत्रीमध्ये मिळत असली जरी सर्व नाती,

तरी स्नेहासाठी गरज नसते

जुन्या घट्ट मैत्रीची!

स्नेहामध्ये असतो परस्परांप्रती मान,

कुणाचे तरी स्नेहांकित असण्याचा 

वाटतो अभिमान!

मित्र आणि स्नेही

एकाच नाण्याच्या दोन बाजू,

कोण जवळ,कोण दूर

मोजण्याचा नसे तराजू!

सहज ओळखीतूनही स्नेह होई वृद्धिंगत,

मैत्री जमे नित्य सहवासातून

रमतगमत!

मैत्रीत स्नेह असतोच,

पण स्नेहात मैत्री असेलच असे नाही!

मैत्री म्हणजे आपलेपणाचा हक्क आणि जवळीक

स्नेहामध्ये असे आदर आणि आपुलकी!

दोघांचे आपल्या मनात असे योग्य स्थान,

ह्या नात्यांमध्ये होऊ नये गल्लत,

ठेवायला हवे भान!


              

स्नेह - शर्वरी जोशी


स्नेह जुळावा असा की 

उमलून यावे नाते

आठवणी आळवाव्या

 गोल फिरे जसे जाते...


स्नेह जुळवा गोडसा

भेट घडावी रोजच

दूर राहिलो कीतीही 

वाटे भेटलो आजच...


स्नेह जुळवा कामाशी

स्नेह जुळवा धर्माशी

तिन्ही त्रिकाल ध्यासात

सत्य भेटावे मर्माशी


स्नेह टपोरा मोगरा

त्याच्या सुवास गहीरा

राहो वात्सल्य भारुनी 

जसे जपतो माहेरा


स्नेह सुंगधी अत्तर

त्याच सुगंधाचा फाया

शब्द तसे गोड..बोलू

मोहरावी मने काया...


नवी सुरुवात - वनजा देव

 खरं तर आयुष्याच्या प्रवासातले प्रत्येक वळणच

असते नवी सुरूवात,

जन्म,शिक्षण,नोकरी,प्रपंच

आणि शेवटचे उतारवय,

शिकत राहतो आपण 

कधी चुकतो,सावरतो,

कधी यशस्वी,कधी अयशस्वी,पण

प्रयत्न अथक करत राहतो!

 सुरूवात चांगली व्हावी

ही  केवळ इच्छा 

असून चालत नाही,

करायला लागतात कष्ट आणि मनात असावी लागते जिद्द!

व्यवहाराच्या पलीकडेही असतात अनेक कामना,

खूप काही छंद आणि भावना!

पण कोणतीही सुरूवात करणं,

वाटतं तितका सोपा नाही खेळ,

भावना,अर्थकारण,वेळ 

सार्यांचा घालावा लागतो यथायोग्य मेळ!

अन्यथा,दिवस,वार मास वर्ष सरत जातात,

कशाची करायची होती सुरूवात,

त्या फक्त सलणार्या आठवणी होतात.


 यास्तव ,दिवस वार मुहूर्ताची बघू नये वाट,

योग्य संधी मिळताच  

शुभस्य शीघ्रम् म्हणत

करावी लगेच नवी सुरूवात!


       

नवी सुरुवात - आशुतोष नूलकर

 सुरुवात करू ही नव्याने


करूया आता नवी सुरुवात, तोरण बांधून दारात


गुढी ही चैतन्याची, जणू काही ती पर्वणीच सुखाची


सुरू झाले नवीन मराठी वर्ष, स्वागत करूया सर्वे मिळून सहर्ष,


मराठी वर्षाचे पहिले पान चैत्राचे, या वर्षवृक्षावर फुल उमलू दे मैत्राचे


नवी सुरुवात करायची पण ती कशी ह्या प्रश्नामध्येच अनेकजण हे फसलेले दिसून येतात. त्यासाठी अनेक तर्कवितर्क, विचार, प्रश्न, उत्तरे, गोंधळ असे सर्वांचे मिश्रण एकत्रितपणे आपल्या मनामध्ये दाटून येते. या सर्व मिश्रणातून तोडगा म्हणून आपल्याला मुक्तता हवी असते आणि ती मिळते आपल्याला हव्या असलेल्या नव्या सुरुवातीने..


खरं तर सुरुवात आपण कोणत्याही क्षणी करू शकतो फक्त त्या सुरुवातीला सोबत हवी असते ती योग्य आणि मजबूत अशा मनोधैर्याची.. जर हे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असेल, तर नव्हत्यातल्या गोष्टी देखील करून दाखवण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि हे आपण जितक्या लवकर जाणून घेऊ तितक्याच लवकर आपल्यासाठी गोष्टी या सहजसोप्या होऊ शकतील.


काही जण नवीन सुरुवात करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची वाट बघत बसत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ती ते करून मोकळे होतात. तर काही जण हे योग्य वेळेची, योग्य दिवसाची तर काही वेळा योग्य मुहूर्ताची वाट पाहतात आणि तो दिवस आला की, त्यांच्या महत्वाच्या कामांचा श्रीगणेशा करतात. काही वेळा त्यांचा यामागचा हेतू हा पुढे भविष्यात जाऊन या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे किंवा नव्या सुरुवातीला शुभ दिवसाची सुंदर किनार देणे हा असतो. याद्वारे त्यांची ही नवी सुरुवात ही अविस्मरणीय होण्यास मदत होत असते.


कोणत्याही व्यक्तीने केलेली नवीन सुरुवात ही त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. नवीन सुरुवातीकडे पाहायचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन त्या व्यक्तीला त्या कामामधून मिळणारे यश ठरवत असतो. ते म्हणतात ना की, कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या गोष्टीची योग्य सुरुवात करणे हे महत्वाचे असते.


कधीकधी असे होते की, आपण ठरवल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची सुरुवात होत नाही. पण अशा वेळी वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन कसे यशस्वी होऊ याबद्दल नेहमी विचार करायला हवा. तसेच नुसता विचार न करता त्या गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या दृष्टीने कृती देखील करायला हवी.


यंदा ९ एप्रिल, २०२४ रोजी गुढीपाडव्यासारख्या सुंदर दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यादिवशी अनेकांनी त्यांच्या नवीन कामाची नवीन सुरुवात केलेली असेलच. त्यांचे ते काम तडीस नेण्यासाठी त्यांना योग्य ते बळ व मनोधैर्य मिळू देत.


कोणीही त्यांची नवीन सुरुवात करताना आपण आपल्या आयुष्यात आधी झालेल्या चुकांमधून काय शिकलो आहोत हे नेहमी स्मरणात ठेवायला हवे. त्या चुका आपल्या हातून पुन्हा होणार नाहीत याची योग्य ती काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.


गुरू ठाकूर सरांनी त्यांच्या सुंदर शब्दात जुन्या गोष्टींमधून नव्या गोष्टींकडे होणारे संक्रमण हे शब्दबध्द केलेले आहे. ते म्हणजे,


रीत म्हणूनी पुढेही जाणे भागच आहे राहून गेले मागे नक्की काय स्मरेना मिटली जरी दारे सगळी सरत्या वर्षाने तरीही ह्या पायरी वरूनी पाय निघेना...


ही कविता वाचून नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा दिल्यासारखे होते. पण या जुन्या आठवणींना दिलेला उजाळा आपल्याला भविष्यातील आठवणी आणखीन अविस्मरणीय करण्यास मदत करत असतो. सर्व गोष्टी एकत्रितपणे सामावून घेऊन जो माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, ती सुरुवात खऱ्या अर्थाने नवी सुरुवात आहे.



शून्य - वनजा देव

शाळेतल्या गणितात गुण मिळविण्यासाठी सगळेच करतात धडपड,पण

आयुष्याचे गणित सोडविणे त्याहूनही असे अवघड!

अंकगणित,बीजगणित आणि भूमिती

तीनही विषय एकत्र येती!

काळ,काम,वेगाचे अंकगणित,

सुटता सुटत नाही,

क्ष आणि य ची बीजगणितातली समीकरणे 

इथे जुळता जुळत नाहीत!

भूमितीतल्या वर्तुळाच्या परीघाबाहेर जाऊन चालत नाही!

घरातल्या त्रिकोन-

चौकोनांच्या बाजूच जुळत नाहीत !

हातचा राखला तरी वा घेतला तरी,

कशी कोण जाणे,पण

बेरीज चुकते!

दशांश चिन्हांची गफलत

जसे बदले शून्याचे  स्थान !

तसेच जीवनातली एक चूक

बदले समाजातला मान!

 आयुष्याच्या जगण्याचे

 समजून घ्यावे लागते मर्म,

जरा चूक होता,

बोट ठेवायला इतरांना सापडते वर्म! 

त्यास्तव शेवटचे उत्तर नसावे  अपूर्ण!

नसावी कुठली बाकी!

देणे -घेणे,राग -लोभ,

प्रेम -असूया,

सारे इथले इथे सोडून

यावे  उत्तर शून्य !

म्हणजे होईल आयुष्य सुफळ संपूर्ण!

शून्याचे स्थान आहे इथे चिरंतन,

त्यातूनच विश्वाचे निर्माण

आर्यभट्टांनी शोध लावला ,

भारताला लाभला विश्वात मान 

असावा त्याचा अभिमान!




शून्याची गंमत -- सुनिता वैद्य

एकदा काय झाले, 

काय झाले, काय झाले

शून्य रुसून कोपऱ्यात बसले...


आई म्हणाली, काय झाले बाळा?

म्हणाला, किंमतच नाही मुळी मला....


पेपर वर दिसताच मुले होतात खिन्न... 

आणि

भागाकरात आलो तर सगळेच सुन्न...


संख्येत मिळवून गेलो काय

किंवा संख्येतून वजा झालो काय

किंवा संख्येच्या डावीकडे बसलो  काय

तरी बदलत नाही उत्तर म्हणजे

मुळी किंमतच नाही मला...


आईने पटकन उचलून घेतले 

संख्येच्या उजवीकडे नेवून बसवले

संख्येची किंमत लगेच वाढली

बघता बघता वाढतच गेली...

अन् शून्याची स्वारी खूष झाली,

गालात खुदकन हसू लागली...



शून्य - अनीता जोशी

 शब्दांनीच काढिले वर्म 

शब्दातून घातला घाव 

संयम सुटला मनाचा

जसे मनास आले खेळीला डाव


बोचरे शब्द झेलताना वाटले

 जणू टोचले असंख्य काटे

 अर्थ त्याचे काळीज भेदीत गेले  

अश्रू होऊन वाहिले डोळ्यां वाटे


हृदयशून्य या दुनियेशी

 आता कितपत झगडावे

 माणसानेच का रे 

माणुसकीला सोडावे


 शब्द फुलांच्या बागेतून

 का नच शब्द वेचून आणावे 

नाहक वर्म काढत 

नात्यांचे धागे तोडावे


 शब्द फुलांच्या गुंफित माळा 

बनवावे अलंकार

 बहरून येईल नाते 

आनंदाला नुरे पारावार

मी - दुष्यंत देशपांडे

मी रडतखडत उभारी धरत घडत गेलो 

तासून घासून मलाच मी घडवीत की हो गेलो 

घाव माझ्यावर कित्येकानी कुठे कुठे हो केले

 मी स्वतःच स्वतःला सुबक घडवत गेलो 

खडतर वाटा कित्येक होत्या भेटल्या

 वेदना दाबीत उराशी मी पुढेच चालत गेलो 

प्रवासामाजी कित्येक चांगली सोबतही भेटली

 माणसातली माणुसकी पहात अन शोधत मी गेलो 

पायावरती उभे राहणे जगानेच की हो शिकविले

 एक एक पाऊल टाकता मी तरुन की हो गेलो

 आता मागे वळून पाहता वाट अंधुकशी हो दिसे 

किती अंतर चाललो माझे मीच विसरून गेलो

 पुढचा स्वच्छ प्रकाशच आता आहे फक्त उरला

 मागचा अंधार मी केव्हांच विसरून गेलो 



मी - वनजा देव

जन्म होतो तेव्हा कुठे माहित असतं,"मी" कोण?

हळूहळू समजत जातं,

मी आणि माझं कोण?

मी म्हणेन तसंच घडावं,

मी मागेन,ते मला लगेच मिळावं!

प्रत्येक "मी"ला असंच वाटत असतं!

 वयाने मोठं होत जाताना

"मी" च्या आतला "मी"ही मोठा होत जातो,

तो सुखावतो,दुखावतो!

"मी"ला भौतिक सुखाची  फार लालसा,

सतत काहीतरी मिळविण्याची आकांक्षा!


"मी" ,"माझं"चं 

"आम्ही","आपलं","आमचं"

म्हणून बदल स्विकारताना

आतल्या "मी"शी होतो  संघर्ष!

घेत रहावा लागतो सारा परामर्श!

ह्या माझ्या आतल्या"मी" चं सुख समाधान नक्की आहे तरी कशात,

 हे समजेपर्यंत निघून जाते निम्मी हयात!

"मी"ला वेळ पाहून गोंजारावं लागतं,

कधी फटकारावंही लागतं,

तो"मी" ताब्यात असेल तर

सारं आयुष्य सोपं होतं!


            

त्याग - राजश्री मानकर

स्वतःच्या सुखाचा ना करूनी विचार

बाळासाठी झिजे रात्रंदिन ती माऊली 

आईविना कोण असेल ती त्यागमूर्ती?


देशाच्या रक्षणा तैनात सीमेवरी

घरदार सोडून कर्तव्याशी बांधील

सैनिकांच्या त्यागाची तुलना कैसी?


घेता घेता दोन कराने 

समाज ऋणातून व्हावे उतराई

इतुका तरी त्याग योजावा मनी?


त्याग करण्या ना व्हावे संन्यासी 

संसारी राहूनी ही साधेल सहजी

प्रेमाचे बांध जोडतील ना पूल?

  

प्रारंभ - अनीता जोशी

 आज अचानक मनात आलं

 आपणही एक कथा लिहावी

 मनातल्या कल्पनांना शब्दरूप देऊन 

कागदावर मांडावी 

घेतली हातात लेखणी 

 प्रारंभ कसा करावा समजेना

 सुरुवातीला काय लिहावे

 हे काही मनास उमगेना 

शब्दांनी मग फेर धरला 

माझा मनाचा कौल त्यांना उमजला 

झरू लागले शब्द

भरभर  कागदावर 

लेखणी बाजूला ठेवली 

कथा लिहून झाल्यावर

खूप आनंद झाला 

कथा मनासारखी जमली 

शब्दांनी माझ्या कल्पनांना

 अनमोल साथ दिली

प्रारंभ - सपना

 नव्या वाटेचा नवा प्रकाश,  

नवी स्वप्नं, नवा विश्वास।  

पहिलं पाऊल पुढे टाकू,  

धैर्याने नव्या दिशा शोधू।।  


उगवत्या सुर्याची पहिली किरण,  

घेऊन येते नवं जीवन।  

प्रत्येक क्षण हा संधी घेई,  

नवा आरंभ नवी उमेद देई।।  


भीती, शंका दूर सारू,  

स्वप्नांच्या दिशेने उंच झेप घेऊ।  

गड्या नवा प्रारंभ आपला,  

यशाची गाणी गाऊ।।  


नवी उमेद, नवी जिद्द,  

नवी आशा, नवी सिद्धी।  

प्रत्येक प्रारंभ हा शुभ असो,  

संकल्प आमचा दृढ राहो।।  



साद - अनीता जोशी

 कधीतरी सांज एकटीच असते 

गजबज आटपलेल्या मांडवागत

 अशा वेळेस ती हळूच येते

घेऊन आठवणींची सोबत

डोळ्यातल्या दाटलेल्या आभाळाला

 हलकेच स्पर्शून जाते 

कशाला आठवणीत गुंततेस सये ??

 गालावर ओघळलेले थेंब

 पुसून जाते

जाताना सांगून जाते...

 प्रत्येक क्षण अमौलीक

 घे  त्याचा आस्वाद

आहे जोवरी जीवन 

 ऐक मनाची साद

साद - विद्याधीश

दूर नभाच्या पल्याड माझे

नाव पुकारे कोण सारखे?

कोण खुणावे मला अवेळी?

सूर कुणाचे हलके हलके?


क्षितिजावरुनी भल्या पहाटे

किरणांसोबत येई कोणी

कानी माझ्या लागुनि आणिक

मूक स्वराने गाई गाणी


गाण्यामधुनी कथा ऐकवी

दूर देशिच्या अद्भुत सुंदर

स्वप्न असे की सत्य कळेना

गोष्ट ऐकता मजला नंतर


कथा संपता भरून राही

एक अनामिक मनात ओढ

क्षितिज लंघुनी पल्याड जावे

हीच एकली इच्छा गाढ


आणिक जाउन असा पोचलो

क्षितिजाच्याही पल्याड जेव्हा

वळुन एकदा साद घातली 

मीच माझिया मनास तेव्हा 



व्यर्थ - प्रज्ञा कोर्डे

 व्यर्थ आहे जन्म तुझा 

व्यर्थ आहे भावना

 प्रेम नात्यात ओल नाही

 व्यर्थ त्या संवेदना 

 

व्यर्थ ती पूजा अन 

व्यर्थ तो धर्म आहे 

माणुसकीचा अंश नाही

 व्यर्थ ते कर्म आहे


व्यर्थ ते पुण्य 

अन व्यर्थ  ते दान आहे

भूक ज्याने क्षमत नाही 

व्यर्थ ते अन्न आहे


व्यर्थ ती स्वप्ने अन्

व्यर्थ तयांची आस आहे

कष्टाविना सर्व मिळेल 

व्यर्थ हा विश्वास आहे


व्यर्थ ते जगणे

व्यर्थ तो ध्यास आहे

अहम भावा पोटी निपजणारा 

व्यर्थ तो श्वास आहे


व्यर्थ - राजश्री मानकर

चिंता उद्याची व्यर्थ कशास?

आजचा क्षणच आहे खास।

क्षणभंगूर जीवन जगूनी घ्यावे,

उद्यावरती व्यर्थ का विसंबावे?

पैसा आज असेल उद्या नसेल,

व्यर्थ चिंतेपायी का झुरावे?

काय मिळविले काय गमावले,

व्यर्थ हिशोब कशास मांडावे?

जे आपुल्या हाती नसते,

व्यर्थ विचारात का बुडावे?

व्यर्थ कुणाशी तुलना कशास?

साधे जगूनी सुखी रहावे।

वेळेचे मोल वेळेवरी जाणावे,

व्यर्थ पश्चाताप ना करावे।

जीवन आपुले ना जावे व्यर्थ,

आठवणीत रहाण्यात आहे अर्थ ।

 - 

जिंकून सुध्दा..... - यशवंत देव

   बुद्धिबळातील राजा

   आज जिंकला होता

   बुद्धिबळाच्या जोरावर

   तरी तो रडत होता

   जिंकून सुध्दा.....

   हत्ती गेले उंट गेले

   घोडे गेले वजीर गेले

   प्यादे सुध्दा गेले

   होते एखाद दुसरे शिल्लक

   सोबत कोणी न उरले

   म्हणून,

   राजा रडत होता

   जिंकून सुध्दा.....

   ही गोष्ट,

   सारीपटावरच्या राजाची नाही

   आयुष्याचा सारीपाटही 

   थोडाफार कळायला लागतो

   नाहीतर,

   जगात मी च्या जगण्यात

   सांगा ना कधी

   कोण कोणासाठी उरतो

   म्हणून बुद्धही,

   कधी कधी कळायला लागतो

   नाहीतर जगात

   कोण कोणासाठी असतो.....

   पृथ्वी, जल, अग्नी

   वायु आणि आकाश

   हेच,

   त्रिकालाबाधित सत्य आहे

   हे ज्याला कळते

   तोच अजरामर असतो

   नाहीतर

   बुद्धिबळाचा पट असो

   वा

   आयुष्याचा

   तो जगात जिंकून सुध्दा

   हरलेला असतो...............


                   

गोष्ट - दुष्यंत देशपांडे ,कराड

उन्हाळ्यात गावाकडं समद्यांची 

          हाथरुणं अंगणात असायची 

 दहा-पंधरा पोरांचं लेंढार 

           तवा आजीभोवती जमायची 

कुटुंब समदं एकत्र होतं 

        सख्खी ,चुलत समधीच असायची 

आत्या ,मामाची पोरं बी

         सुट्टीला सारी एकत्र जमायची 

आजीभोवती मंग गराडा 

          समद्यांचाच पडायचा

 नवी गोष्ट ऐकाया मिळणार म्हुन 

       प्रत्येक जण खुश असायचा

 आजीची गोष्ट कदी मंदी राजा राणीची

       तर कधी कधी भुता-खेता ची 

गोष्ट ऐकुनशान समदी

         लई घाबरून जायाची 

मग रातभर एकमेकांना बिलगून 

          हळूच झोपून जायची

 आता गावाकडं  ना घर राहिलं

       ना आंगण ना गोष्ट सांगणारी आजी

 वन बीएचके च्या फ्लॅट मंदी घरातली

       इनमिन तीघंबी मोबाईल मध्ये बिझी



भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...