शाळेतल्या गणितात गुण मिळविण्यासाठी सगळेच करतात धडपड,पण
आयुष्याचे गणित सोडविणे त्याहूनही असे अवघड!
अंकगणित,बीजगणित आणि भूमिती
तीनही विषय एकत्र येती!
काळ,काम,वेगाचे अंकगणित,
सुटता सुटत नाही,
क्ष आणि य ची बीजगणितातली समीकरणे
इथे जुळता जुळत नाहीत!
भूमितीतल्या वर्तुळाच्या परीघाबाहेर जाऊन चालत नाही!
घरातल्या त्रिकोन-
चौकोनांच्या बाजूच जुळत नाहीत !
हातचा राखला तरी वा घेतला तरी,
कशी कोण जाणे,पण
बेरीज चुकते!
दशांश चिन्हांची गफलत
जसे बदले शून्याचे स्थान !
तसेच जीवनातली एक चूक
बदले समाजातला मान!
आयुष्याच्या जगण्याचे
समजून घ्यावे लागते मर्म,
जरा चूक होता,
बोट ठेवायला इतरांना सापडते वर्म!
त्यास्तव शेवटचे उत्तर नसावे अपूर्ण!
नसावी कुठली बाकी!
देणे -घेणे,राग -लोभ,
प्रेम -असूया,
सारे इथले इथे सोडून
यावे उत्तर शून्य !
म्हणजे होईल आयुष्य सुफळ संपूर्ण!
शून्याचे स्थान आहे इथे चिरंतन,
त्यातूनच विश्वाचे निर्माण
आर्यभट्टांनी शोध लावला ,
भारताला लाभला विश्वात मान
असावा त्याचा अभिमान!
No comments:
Post a Comment