Tuesday, 29 April 2025

सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा - कथांच्या कुशीत स्त्रीमनाची हलकीशी साद


लेखिका : अरुणा ढेरे

समीक्षक : समीर गुधाटे

केवळ कथा नव्हे, हे भावविश्व आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी असतात – पूर्ण सांगाव्याशा वाटणाऱ्या पण कधीच पूर्ण न होणाऱ्या. अरुणा ढेरे यांचा हा कथासंग्रह अशाच अनेक अर्धवट, अपूर्ण, पण मनाशी घट्ट विणलेल्या गोष्टींना आवाज देतो. या कथा फक्त वाचण्यासाठी नाहीत – त्या अनुभवण्यासाठी आहेत.

जुन्या-नव्या काळाची अद्वितीय सांगड

या संग्रहात एकूण १९ कथा आहेत – त्यात ११ विसाव्या शतकातील वास्तवाशी नाते सांगणाऱ्या, आणि ८ पुराणकाळ, रामायण-महाभारत यासारख्या प्राचीन स्रोतांवर आधारित. पण या दोघांमध्ये कुठेही खाचखळगे वाटत नाहीत. जुने आणि नवे इतकं सुंदरपणे मिसळलेले आहेत की काळाची सीमारेषा पुसली जाते.

स्त्रियांच्या मनाचा सुगंधित तळ

या कथांतील स्त्री व्यक्तिरेखा हे या संग्रहाचे खरे शिल्प आहेत. ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ मधील वेणाबाई, ‘मायलेकी’ मधली शकुंतला-मेनका, ‘प्राक्तन’मधील सुहास, ‘धुकं’मधील पद्मा – या सगळ्या व्यक्तिरेखा खऱ्या वाटतात, आपल्यासारख्या वाटतात. त्या ऐतिहासिक असो वा समकालीन, त्यांच्या भावना मात्र सार्वकालिक आहेत – प्रेम, वेदना, प्रश्न, आणि स्वतःचा शोध.

लेखनशैली – तरल, पण ठसठशीत

अरुणा ढेरे यांचे लेखन ही एक सौंदर्यदृष्टीची अनुभूती आहे. संवाद थेट, पण खोल. वर्णनं रसाळ, पण अति न होता. प्रत्येक कथेत एक अशी झलक असते की ती वाचकाला अंतर्मुख करते. "शब्दांची फुलं नाहीत, पण त्यात असलेली गंधमय मुळे जाणवतात."

कथांमधून उमटणारे प्रश्न – अनुत्तरित पण आवश्यक

या संग्रहातील एक मोठा सामर्थ्यबिंदू म्हणजे तो वाचकाला सतत विचार करायला भाग पाडतो. "माय होणं म्हणजे काय?", "काही नात्यांचं नाव असावं लागतं का?", "शेवटी माणूस भावनांनी जिवंत असतो की आठवणींनी?" – अशा अनेक प्रश्नांची पडझड कथांमधून होते.

शेवट – जुन्या वेदनेतून उगवणारी नवचैतन्याची पालवी

पुराणकाळावर आधारित शेवटच्या कथा वाचताना एक विलक्षण अनुभव येतो – आपण जणू काळाच्या मागे चालत चालत त्या काळात पोहोचतो, आणि तिथून वर्तमानाकडे वेगळ्याच नजरेनं पाहतो. या कथा आपल्या आत खोलवर रुजतात.

का वाचावं हे पुस्तक?

‘सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा’ हे केवळ कथा सांगणारं पुस्तक नाही. हे अंतर्मनात खोल उतरून आपल्याला आपलंच मन ऐकवणारं एक माध्यम आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या स्वतःच्या आठवणी, भावना, आणि गूढ कोपरे जागे होतात.

शेवटचा विचार…

या कथासंग्रहात आपण केवळ पात्रांना भेटत नाही, तर स्वतःला एका नव्या संवेदनशीलतेनं पाहायला शिकतो.

हे पुस्तक म्हणजे –
हृदयाच्या पायवाटांवर लिहिलेल्या गोष्टींचं एक साक्षात्कारमय गाणं –
जे शब्दांत जितकं ध्वनित होतं, त्याहून अधिक मौनात उमगून जातं!

Tuesday, 22 April 2025

छावा – सिंहाच्या बछड्याची कहाणी, काळजाला भिडणारी!

 


लेखक : शिवाजी सावंत

समीक्षक : समीर गुधाटे

"छावा" – केवळ एक पुस्तक नाही, ती एक भावना आहे.

माझ्या वाचनप्रवासात अनेक पुस्तके आली. काही विस्मरणात गेली, तर काही मनात घर करून बसली. पण "छावा" वाचल्यानंतर मनात जे काही घडलं, ते शब्दांत पकडणं फार कठीण आहे. ही फक्त ऐतिहासिक कादंबरी नाही – ती रणभूमीवरच्या रक्ताची, शौर्याची आणि निष्ठेची एक धगधगती साक्ष आहे.

इतिहास जिवंत करणारा अनुभव

मृत्युंजय’नंतर शिवाजी सावंतांनी दिलेली ही अजोड निर्मिती म्हणजे ‘छावा’. एका असामान्य पुत्राची – ज्याचे वडील म्हणजे संपूर्ण मराठी मनांचं दैवत – छत्रपती शिवाजी महाराज. पण त्या अजरामर सावलीत उभा असलेला ‘छावा’, स्वतः एक तेजस्वी सूर्य होता – जो अनेकदा दुर्लक्षित राहिला.

छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण, सईबाईंचं अकाली निधन, धाराऊंच्या छायेत झालेलं वाढणं, संस्कृत, फारसी आणि मराठी भाषांतील त्यांचं गाढ ज्ञान – हे सर्व वाचताना एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. एका बाजूला असामान्य शौर्य आणि दुसऱ्या बाजूला खोल भावनिक संवेदनशीलता – अशी दुर्मिळ सांगड त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळते. ते एक असा राजा होते, ज्यांनी केवळ तलवारीने नाही, तर बुद्धीने आणि राजधर्माने इतिहास घडवला.

सत्तेच्या शिखरावर पोहोचणं म्हणजे यश नव्हे; त्या शिखरावर टिकून राहणं हीच खरी कसोटी.”

ही ओळ वाचताना मनात वारंवार घुमत राहते. संभाजी महाराजांनी केवळ स्वराज्य जपलं नाही, तर त्याला नव्याने जिवंत केलं. सातत्याने होणाऱ्या शत्रूंच्या आक्रमणांतही त्यांचे निर्णय, त्यांचं नेतृत्व आणि मातृभूमीवरील त्यांची अढळ निष्ठा पाहता मनात एकच प्रश्न येतो – "अशा व्यक्तिमत्त्वाला आपण इतकं विसरतो कसं?"

एक जागृती घडवणारा अनुभव

ही कादंबरी मी फक्त वाचक म्हणून अनुभवली नाही, तर एक जागरूक नागरिक, इतिहासप्रेमी आणि एक पुत्र म्हणून – ज्याला देशासाठी आणि पित्याच्या स्वप्नांसाठी लढायचं आहे – अशी ती अनुभवली.
शिवाजी सावंत यांची लेखनशैली अत्यंत प्रभावी. संवाद तलवारीसारखे धारदार, आणि भावनांनी ओथंबलेले. शेवटच्या काही पानांमध्ये संभाजी महाराजांचा छळ, त्यांचं मानसिक-शारीरिक शोषण आणि तरीही त्यांची न झुकणारी मान – हे सर्व वाचताना मी काही वेळ पुस्तक बाजूला ठेवावं लागलं. मनात संताप, असहायता आणि अभिमान – हे सारे एकत्र उफाळून आले.

संभाजी – एक विचार, एक तेजस्वी छाया

या पुस्तकातून हे प्रकर्षाने जाणवतं की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते. ते विद्वान होते, कविकुलगुरू होते.कविकुलेश’ या टोपणनावाने त्यांनी सृजनशीलतेला हात घातला. तलवार चालवणारा राजा रात्री कविता करतो – हे मला थक्क करून गेलं. आजच्या काळात अशा संतुलित व्यक्तिमत्त्वांची नितांत आवश्यकता आहे – ज्यांच्याकडे शौर्य आहे, आणि सौंदर्यदृष्टीही.

त्यांचं आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष म्हणजे दोन टोकांची प्रतीकात्मक लढाई – एक धोरणी सम्राट आणि दुसरा धर्मांध शासक. स्वधर्मासाठी आणि स्वराज्यासाठी दिलेली त्यांची शहिदी आजही लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि आत्मगौरव यांचं अधिष्ठान बनू शकते.

शेवट – काळजाला चिरणारा, अंतर्मनाला हलवणारा

पुस्तकाचा शेवट वाचणं म्हणजे आपल्या असहायतेशी आणि अंतर्मनाशी भिडणं. संभाजी महाराजांचा छळ, त्यांचं अपमानित करणं, आणि तरीही त्यांनी स्वीकारलेली मृत्यूची सन्माननीय वाट – हे सर्व वाचून डोळ्यात अश्रू येणं अपरिहार्य ठरतं.
ही वेदना नाही – ही जागृती आहे. स्वतःला विचारण्याची वेळ – आपण आपल्या मूल्यांवर किती ठाम आहोत? आपल्याला आपलं स्वत्व किती प्रिय आहे?

व्यक्तिमत्त्वातील बहुविध पैलू

संभाजी महाराज हे ‘केवळ राजा’ नव्हते – ते एक पुत्र, पती, मित्र, विद्वान आणि संवेदनशील माणूस होते. त्यांच्या निर्णयक्षमतेत बुद्धिमत्तेचा कस आणि त्यांच्या नेतृत्वात धैर्याचा ठसा दिसतो. आजच्या जगात ही मूल्यं जपणं अवघड असलं, तरी ते अत्यावश्यक आहे.

का वाचावं हे पुस्तक?

छावा’ हे केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही – ते आपल्याला आपल्या इतिहासाशी, आपल्या मुळांशी नवं नातं सांगतं. हे पुस्तक प्रत्येक मराठी वाचकाने वाचलंच पाहिजे.
कारण इतिहास विसरणाऱ्यांना इतिहास पुन्हा शिक्षा करतो.

संभाजी महाराजांचं जीवन म्हणजे ती शिक्षा टाळण्याची, आत्मभान जागवण्याची आणि मूल्यांची जपणूक करण्याची एक सजीव शिकवण आहे.

शेवटचा विचार…

छावा’ वाचताना तुमचं मन शून्य होतं… आणि मग भरतं – अभिमानाने, वेदनेने, आणि प्रेरणेनं.

हे पुस्तक म्हणजे एका अमरवीराच्या आयुष्याचं गीत –
सुरांनी नटलेलं शौर्य, तालात गुंजणारी निष्ठा, आणि अखंड स्वराज्याचा प्रतिध्वनी!


— समीर गुधाटे

जगातला एकमेव वाचक-समीक्षक, ज्याने सलग ३६५ दिवसांत ३६५ पुस्तकांचं परीक्षण करून विश्‍वविक्रम नोंदवला आहे. साहित्य, वाचनसंस्कृती आणि भाषेच्या सौंदर्यावर नितांत प्रेम करणारा एक शब्दसाधक.

 

Saturday, 5 April 2025

पाणी - विद्याधीश

 पाण्यासारखं होता आलं पाहिजे


मनुष्याला पाण्यासारखं होता आलं पाहिजे

परिस्थतीनुसार वाहता आलं पाहिजे


याचा अर्थ असा नव्हे की दुसरा म्हणेल

तसं आपल्याला वागता आलं पाहिजे

पाण्यालाही असतात आपले असे गुण

ते जपूनच स्वतःला वळवता आलं पाहिजे


उतारावर वेगात, चढावर धीम्याने साचत 

पत्थरांना फोडून पार जाता आलं पाहिजे

नदी होऊन मनमोकळं बागडताना देखील

डोह होत खोल गंभीर होता आलं पाहिजे


सतत सहन करणं मुळीच नसलं सोपं तरी

घाव सोसूनही एकसंध राहता आलं पाहिजे

आपली ओळख जपून समोरच्याचं बिंब

जशास तसं त्याला दाखवता आलं पाहिजे


समुद्रासारखं सामावून घेताना सारंकाही

ओंजळीमध्ये स्वतः सामावता आलं पाहिजे

माणसानी पाण्यासारखं झालं पाहिजे

शांत रहात, प्रसंगी उसळता आलं पाहिजे 



पाणी - सौ. नीता जोशी

 पाणी

सुखाचं आणि वेदनांचं दोन्ही वेळचं पाणी एकाच वेळी कसं काय येऊ शकते डोळ्यांत? 

माणसाच्या भावनांचा किती सुंदर हा मिलाफ 


वेदना प्रसुतीच्या सहन करतांना 

वाहत राहते डोळ्यांतून पाणी

प्रतिबिंब आपुले हाती पाहता 

जीवन सार्थक, पाणी लोचनी 


लेकीची करतांना पाठवणी

वियोगाचे डोळा पाणी 

चांगला जोडीदार मिळाला 

म्हणूनी मन असे समाधानी


प्रगती पाहतांना पिल्लांची

अभिमानाने भरतो ऊर 

परदेशी त्यांची गाडी निघता

मनी मायेचे उठे काहूर 



भेट - शर्वरी जोशी

 ‌ कृष्णस्पर्श...**

पहाट झाली यामुनेकाठी

धुक्यात घुमतो मंजुळ पावा

लोहगोल ये क्षितिजा वरती

राधा स्मरते मन्मनी रावा


 पारावरची भेट कालची

 क्षण क्षण राधा स्मरे माधवा

  स्पर्श आठवे अंग थर थरे

  हृदयामध्ये गोड कालवा


तिन्हीसांजेची मुग्ध वेळ ती

तिरक्या होत्या लांब सावल्या

 पाऊलवाटा गवता मधल्या

सोनेरी किरणांनी भारल्या


  तेच किरण सोनेरी तनुवर

होती  चमकत  काया सुंदर 

कणकण अंग कनकचि झाले

 जिथे स्पर्शला तो मुरलीधर


जागृती येता तिजसी कळले

सत्य नव्हे ते स्वप्न  खरेतर

तन मन अवघे व्यापून उरला

राधे हृदयी तो हृदयेश्वर...

  

भेट - माधुरी केळकर

 भेट

या प्रसंगी काय 'भेट ' देऊ तुला ? खरं तर हा अडचणीत  टाकणारा प्रश्न...

पण ' भेट ' या शब्दातच उत्सुकता आहे.

लहान मुलांना काही भेटवस्तू मिळाली ,तर त्यांच्या  चेहर्‍यावरचा आनंद आठवा जरा...

आपली मराठी भाषा अत्यंत समृद्ध  आहे. एखादा शब्द  आपण विविध  प्रकारे वापरू शकतो. हा भेट शब्दच बघाना.

लहानपणीचा एखादा मित्र/मैत्रीण  अनपेक्षित पणे अनेक वर्षांनी भेटले ,तर त्या भेटीचा आनंद अवर्णनीय  असतो.

'भेटशील तू नव्याने' अशी आशा बाळगणारा प्रियकर 

प्रेयसीच्या भेटीची आस लावून  असतो.

उतार वयात नव्याने  मित्र/मैत्रीणी जोडले जातात, 

प्रभातफेरीच्या निमित्ताने भेटत राहतात.

नवराबायको, मित्र-मैत्रीणी

प्रसंगानुरूप एकमेकांना भेटवस्तू देतातच..

अनेक दिवसांनी एकत्र आल्यावर 'पुन्हा भेटूया ग'

असं म्हणून निरोप घेतला जातो. रोज ऑफिसमधे भेटणाऱ्यांना सुद्धा दुसर्‍या दिवशीच्या भेटीची ओढ असतेच की.

परमेश्वर  भेटीची आस लागायला आपण काही साधु-संत नाही.

परमेश्वरालाच जेव्हा आपल्या भेटीची इच्छा  होईल, तेव्हा निमूटपणे त्याच्यामागे चालू लागणारे पामर आपण....असो..

  पण वाईट या गोष्टीचं वाटत की सध्या हा शब्द  

सर्रास  चुकीच्या पद्धतीने वापरला जातो...पेन भेटला, पत्ता नाय भेटला....

अरे,वस्तू  मिळतात..माणसं  भेटतात..असं घसा फोडून सांगावसं वाटतं

  ' मराठी 'ला अभिजाततेचा दर्जा यासाठीच मिळाला का ?


लाट - जान्हवी शिधाये

 लाट

लाट वेगे वेगे येई 

सवे  घेऊन भरती

हळू हळू जाई मागे

लाट सरता ओहोटी 

                 मन  माझे लाट जणू

                  तिच्यासारखेच वागे 

                  भावनांचे येणे जाणे

                  कधी हळू, कधी वेगे 

कधी सुखाची भरती

कधी दुःखाची ओहोटी

दोन्ही वेळा मन माझे

लाटे सम  या तरंगे

                  काही लिहिलेले मनी 

                  लाट नेई ते वाहून

                 काही नको असताना

                  येई सवे ते घेऊन

मन माझे लाट लाट 

सदा देई माझी साथ

कधी वाहत जाताना

ओढे धरून हा हात

                 मन स्वार तिच्यावरी

                 करी जगाची सफर

                मन हलके पिसापरी

                भरे आनंदें हा ऊर



लाट - वनजा देव

 प्रेमाच्या लाटेत वाहून जायचं,

शृंगाराच्या लाटात चिंब भिजायचं,

वेदनांच्या लाटांमधून जन्म घ्यायचा,

उचंबळून येणार्या भावनांच्या लाटा कधी अडवायच्या,

कधी अंगावर घ्यायच्या,

विचारांच्या लाटांना प्रयत्नपूर्वक बांध घालायचा!

सुखाच्या लाटांवर अलगद तरंगायचं,

दुःखाच्या लाटांवर स्वार होऊन त्यांना मागे ढकलायचं!

संकटांच्या लाटांशी कसलेल्या नावाड्यासारखं झुंजायचं,

अन् अंतिम क्षणी जन्मवेळच्या वेदनांच्या लाटाच नशिबी आल्या तर त्यातच मिसळून जायचं!


जन्म-मृत्यु,दोन्ही वेळच्या लाटा सुटकेच्याच,

जन्मवेळी आईची शारिरीक सुटका,

बाळाची नऊ मासांच्या बंदीवासातून सुटका!


भवसागरातल्या ह्या लाटा म्हणजेच जीवन,

जीवनाची अंतिम लाटेत विलीन होणं  म्हणजे

ह्या सर्व लाटांच्या भोवर्यातून सुटका !


           

माहेर - सपना

 माहेर – मायेचं गोकुळ


माहेर माझं, मायचं आंगण,

आईच्या पदराचं गार सावलीभान,

त्या दाराशी उभा भाऊ हसरा,

आठवणींचा गाव, डोळ्यात साठवलेला.


बाबांच्या खांद्यावरचं लहानपण हरवलं,

आईच्या कुशीतले क्षण पानं झालं,

भिंतींनी ऐकलेली माझी हसरी गाणी,

आज सासरी येऊन आठवते त्यांची वाणी.


आईच्या स्वयंपाकाचा तो सुगंध,

बाबांच्या स्पर्शातलं ते प्रेम अनंत,

भाऊबहिणींच्या त्या कोड्या,

आजही मनाच्या गाभाऱ्यात खोल साठल्या.


सासरचं सुख असो, संसाराचा डोलारा,

मन शोधत राहतं माहेरचा वारा,

सणवार आले की डोळे भरतात,

आईच्या कुशीत लपायची आस लपून उरते.


भिंतीही ओळखतात माझ्या पावलांचा ताल,

दरवाज्यावरची तुळस विचारते - "कशी आहेस गं बाळ?"

ओसरीवरचं झोपाळं आजही थांबलेलं,

जणू वाट पाहतंय – “कधी परतशील गं लेकरा?”


माहेर म्हणजे ओलावा…

माहेर म्हणजे आधार…

माहेर म्हणजे आईच्या पदराची सावली…

माहेर म्हणजे आठवणींनी भरलेलं घरदारी…


— "माहेर - कायम मनातलं!"



माहेर - गायत्री

 पक्ष्यांची किलबिल येथे..

आंब्याचा गंध केशरी गं..!

कोकण मेवा रुजतो जेथे..

ते देखणे माहेर माझे गं..!!


मंदिरांचा थाट अनोखा..

नारळाची बाग सुरेख गं..!

घराघरात आपुलकी येथे..

ते देखणे माहेर माझे गं..!!


निसर्गाची किमया येथे..

प्रदूषणावर बंदी गं..!

सागराच्या कुशीत वसले..

ते देखणे माहेर माझे गं..!!


संस्कृतीची सांगड येथे..

संस्कारांची शिदोरी गं..!

नात्यांना जे जोडूनी ठेवी..

ते देखणे माहेर माझे गं..!!



होळी - वनजा देव

सर्वस्वाची करूनी होळी

स्वातंत्र्य आणले ज्यांनी खेचूनी,

ते हुतात्मे,ते महात्मे

इतिहासाच्या पुस्तकात 

अमर जाहले!

परी,त्याच स्वातंत्र्यापायी

झाली

 अखंड हिंदुस्थानाची फाळणी अन् 

सप्तरंगांची उधळण न होता  

पुनश्च एकदा

कितीकांच्या सर्वस्वाची झाली होळी!

आजही सीमेवरच्या किती पिढ्या सोसताहेत

त्या होळीची धग ,

 त्या धगीतूनच परत परत

पेट घेत आहे जुने वैर!


वचने,आश्वासनांच्या वा

युद्ध,तह,वाटाघाटींच्या शिंपणाने

 शांत होत नाहीये ही होळी

आणि धुळवड मात्र सारखी साजरी होतीये!

एका ठिणगीही पुरते आहे प्रज्वलित करण्या 

मनामनातला सुप्त निखारा!

शांतवाया त्यांना पुरे न पडे हवेतच विरणारा पोकळ शब्दांचा फवारा,

हवा त्यास्तव शीतल कृतीयुक्त तुषारांचा शिडकावा!

तरच थांबेल

रंगारंगांमधले चालू युद्ध,

अंबरी खुलेल सप्तरंगी इंद्रधनुष्य!


       

होळी - शुभांगी तपस्वी



रंगसखा रंगिला

रंगासवे रंगला

राधाधर सावळा

रासरंगी दंगला


घननीळा धूम्रवर्णी अवकाश मंडळातून अलवार रेशीमधारा छेडीत श्रावणात बरसतो... तेंव्हा नादमधुर सानिका अधराशी धरून नादसखा नादामध्ये नादावतो...धुंद धारात चिंब चिंब भिजतो...अवनीच्या ओल्या कुशीत ओलेता ओलावतो,मृदगंधात गंधावतो...

माया,ममतेच्या मृदु,मुलायम पदराखाली थेंब न थेंब झिरपतो...हिरवा गर्द मोरपिसारा हळूहळू आसमंतात फुलतो,परिसर गर्भरेशमी गर्भाळतो... पुलकीत झालेली सृष्टी नव्या नव्हाळीत रूजलेले,मोरपंखात वसलेले एकेक रंग बावरे रंगधनू उलगडत,उमलवत विविधांगी प्रसवते...

आकाश निळाईतून हिरवाई प्रगटते...हे रंगसंगतीत रंगलेले,गंधलेले ऋतुगंध उधळीत निसर्गदेवता प्रकृती पुरुषाच्या मनोमिलनाचे भावगर्भी भावनांचे एकेक स्तर उत्कटपणे मनामनात रूजवते...ही ऋत्वीक ऋतुजा ऋतुपरत्वे वेगवेगळे साज इतक्या सहज सुलभ रीतीने बदलते...सार्‍या रंगात रंगून ती नाविन्याच्या उन्मेषात रममाण होते...ही राधाधराची अविरत वाहणारी धारा तीच राधा वसंतोत्सवात,होळीच्या रंगोत्सवात सुगधी सुवासात परिमळते...रासक्रीडा वृंदावनी खेळण्यात खेळीयाड दंग होतात...राधाकृष्णाची ही अमरप्रेम कहाणी युगानुयुगे प्रीतरंगात आकंठ डुंबलेली असते...कृष्णाच्या शिरपेचात मोठ्या प्रेमाने खोचलेले भावस्पर्शी मोरपंखी मोरपीस प्रीतगंध जागवते गंधवेल फुलवते...होळीच्या नवरंगात रंगोत्सव उजळते...!!!





स्त्री : माधुरी डोंगळीकर

 ती


ती आहे म्हणुनी विश्व भासते सुंदर

अन् स्वर्गच फुलतो वावरताना घरभर

 सहचरी सखी ती कन्या भगिनी पळभर

 हृदयात उसळतो मातृत्वाचा सागर !


तनु कोमल नाजुक म्हणती सारे अबला

हळुवार बोलुनी मोहविते ती सकला

ही स्वप्नामधली नुरली आता  बाला 

होणार अता ती स्वयंसिद्ध अन् सबला ! 


सोसुनी विखारी चटके आयुष्याचे

उघडते नवनवे दालन ती ज्ञानाचे

आचार विचारी वारे प्रगल्भतेचे

 बळ देते तिजला तिच्यात विश्वासाचे !


गगनात घेउनी उंचच उंच भरारी

धडपडते परी न फिरते ती माघारी 

ती सत्याची अन् न्यायाची कैवारी

चंडिका कालिका दुर्गा तारणहारी !


प्रश्नांना लाखो देते रोजच उत्तर

अस्तित्वासाठी युगायुगांचा संगर

 रूपात तिच्या नवदुर्गांचा नित वावर

अंतरी चालतो दिव्य शक्तिचा जागर !


        

स्त्री - गायत्री

 "ती" शौर्याची ज्योत खरी..

"ती" चांदणवाट अलवार गं..!

"ती" निर्मळ माय माऊली..

"ती" दुर्गेचा अवतार गं...!!


"ती" लखलखणारी वीज नभी..

"ती" चंचल पाऊसधारा गं..!

"ती" वाळूतली नक्षी हळवी..

"ती" ज्वलंत पेटता निखारा गं...!!


"ती" सरस्वती अन् लक्ष्मी..

"ती" कुटुंबाचा आधार गं..!

"ती" ध्येयवेडी अन् स्वप्नवेडी..

"ती" लाजणारा शृंगार गं..!!


"ती" कणखर, कर्तृत्ववान..

"ती" गाथा समर्पणाची गं..!

"ती" सहनशील अन् स्वाभिमानी..

"ती" जननी या जगताची गं..!!!


   

मला आवडलेलं पुस्तक - सुवर्णा कुळकर्णी

 मला आवडलेलं पुस्तक.......!"पावन खिंड", "शिव छत्रपती","मी वनवासी", "हिटलर वर लिहिलं  गेलेलं  कुठलही पुस्तक-उदा."नाझी भस्मासुराचा उदयास्त", "हिटलर"इ. अशी बरीच पुस्तक आवडतात......!पण आज जे पुस्तक मी शेअर करणार.....ते म्हणजे मला कुठल्याही पानापासून ,केव्हाही आवडीने वाचाव वाटत असं--- आ.पु.ल.नच -"असा मी असामी"!                                                                                                                                                      "हे" पुस्तक नाहीच.....ही यात्रा आहे!ही मांदियाळी आहे!हा प्रवास आहे!आणि हे हळूच गुगुदुल्या करत आपल्या वर्मावर बोट ठेवणार "पात्रांचं आणि व्यक्तिचित्रणानच"मोठ्ठ संग्रहालय आहे.सर्व सामान्य मानवी स्वभावाच्या सप्तरंगी छटांच दर्शन आपल्याला "यात"होत.सर्वसामान्य , मध्यम वर्गीय लोकांना जगण्यासाठी करावी लागणारी तडजोड , काहीच नाही तर एक चांगल निष्पाप -कुणाच्याही वाट्याला न जाता फक्त आपला आयुष्य-गाडा हाकताना  करावी लागणारी कसरत, ह्या सगळ्या गोष्टींशी आपण वाचता-वाचता केव्हाच एकरूप होत ते कळत देखील नाही.                                                                                                                                                                     आपण स्वत:ही आपला शोध घ्यायला लागतो की......मानसिक दृष्ट्या मी निश्चित यापैकी कुठल्यातरी पात्राशी मिळती-जुळती आहे.कारण कुठल्याच वयोमानाच पात्र यातून सुटलेलं नाही.आणि प्रत्येक पात्राला आपण त्या-त्या वयाच्या चोचल्या- नखर्यानसह भेटतो.अगदी गृहिणी पासून तर "बाबांपर्यंत"कितीतरी पात्र त्या काळातला शब्दांचा ,सामाजिक परिस्थितीचा परिचय करून देतात.                                                                                                                                                       पूर्वी असलेला लोकांमधला जिव्हाळा, चाळीतल एकोप्याचं जगण , एकमेकांच्या दु:ख सुखात आनंदाने सहभागी होणारे शेजारी या ही "संस्कृती"शीआपली जवळून गाठ-भेट होते.छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदित होण्याची सर्व सामान्य माणसाची  समाधानी -मानसिकता पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात आपण पाहतो.                                                                                                                                                   सोबतच खूप साऱ्या खोट्या -मोठेपणाच्या संकल्पनानशि जुळवून घेताना -साधी-सुधी माणस किती गोंधळून जातात आणि त्यांच्या मुळच्या साधे पणापर्यंत सतत परतून जातात.हे वास्तव देखील "या"पुस्तकाच एक वैशिष्ट्य म्हणता येईल.                                                                                                                                                              राहिली गोष्ट लेखकांची.....तर आ.पु.ल.न विषयी  लिहिण म्हणजे आपल्या अज्ञानाच प्रदर्शन होऊ शकत......कारण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विषयी माहिती नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणे अशक्य.....त्यामुळे आ.पु.ल.ना  प्रणाम,नमस्कार.....!इतक्या सुंदर "भाव विश्वाची"निर्मिती आपल्या साठी केली म्हणून.......!खर सांगायचं तर या पुस्तकाला "नव चैतन्यच"वरदान आहे...आपण जितक्या वेळा वाचतो...तितकच ते पुन्हा -पुन्हा वाचाव वाटत; आणि प्रत्येक वेळी वाचल्यानंतर पुन्हा एकदा वाचाव ही ओढ कायम राहते.

विश्वास - शमिका

 मनमें है विश्वास,पूरा हो विश्वास,हम होंगे कामयाब एक दिन !

ह्या ओळी अगदी सार्थ आहेत.कुठलीही गोष्ट दुसऱ्यासाठी वा स्वतःसाठी करतांना एकमेकांबद्दल किंवा स्वतःबद्दल विश्वास असेल तर कोणतीच समस्या येणार नाही.

अगदी बाळ असल्यापासून मोठं होईपर्यंत त्याचा आईवर अतिशय विश्वास असतो.पण मोठं होता होता(शिंग फुटल्यावर) मुलाने सुद्धा चांगल्या वागणूकीने आईवडिलांचा विश्वास संपादन केला पाहिजे.पति पत्नी मधे विश्वास असेल तर कौटुंबिक स्वास्थ्य लाभते.नाहीतर मुलाबाळांसकट संसाराची वाट लागलेली आपण बघतो.

खेड्यापाड्यात किंवा शहरात सुद्धा कित्येक गोष्टींवर अंधविश्वास ठेऊन संसाराची धूळधाण उडालेली दिसते.तरीही आता अंनिस संस्थेने पुढाकार घेऊन परिस्थिती खूपशी आटोक्यात आणलेली आहे !

म्हणूनच आपण विश्वासार्ह वागून आणि चांगले आचरण ठेवून आपले नातेवाईक,मित्र परिवार ह्यांची मर्जी संपादन केली तर जीवन आनंदात आणि सुखात जाईल.

भास -- प्रज्ञा कोर्डे

 भास 

अनुत्तरीत प्रश्नांना ,उत्तराची आस 

कविता म्हणजे निव्वळ भास 


भरून येते ,उमलून येते

 शब्दांची पालखी सजून येते

 अर्था अर्थांच्या बसतात गाठी 

विचारात जातो तांसन्‌तास

 कविता म्हणजे निव्वळ भास


 स्वप्नांवर जडतो जीव 

शब्दांची भाषा  सजीव 

मन मोर पिसारा फुलतो

 गंधाळलेला नवा श्वास

 कविता म्हणजे निव्वळ भास


 भाव आडकतात वेशीमध्ये

 अर्थ दडतात शब्दांमध्ये 

शब्दांनाही फुटतात पाय 

गुंतता गुंतता होते रास

 कविता म्हणजे निव्वळ भास 


कळते तरी वळत नाही 

सुटु म्हणता सुटत नाही 

रोज नव्याने जवळ येते 

गुटमळत राहते आसपास

 कविता म्हणजे निव्वळ भास


माय मराठी - विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

 


‘ लाभले आम्हास भाग्य...’


‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी..’ असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे. त्यात आपल्या मातृभाषेचा समावेश करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउलींनी तर म्हटलेच आहे-


     माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके


     परी अमृतातेही पैजा जिंके


     ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन.


    मराठी भाषेतील थोर लेखक, कवी, नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा होतो. जगाच्या कान्याकोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करतो. मराठीची आठवण करतो, मायभूमीची आठवण करतो. ही मराठी माती इतकी पवित्र आहे की कुसुमाग्रज म्हणतात


          माझ्या मराठी मातीचा


          लावा ललाटास टिळा


          हिच्या संगाने जागल्या


          दऱ्याखोऱ्यातील शिळा.


  मराठी भाषेतील अभंग असो वा ओवी, तिला सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे.


          रत्नजडीत अभंग, ओवी अमृताची सखी


          चारी वर्णातुनी फिरे, सरस्वतीची पालखी.


    या आमच्या मायमराठीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या अर्थाने माझी मराठी ऐतिहासिक आहे, अक्षर आहे, अभिजात आहे. आई जसे आपल्या बालकाचे पालनपोषण करते, तसे या मराठीने तुमचे आमचे पोषण केले आहे. हजारो वर्षांपासून. ते स्तन्य पाजून तिने आपल्याला बळ प्रदान केले आहे. आपले सांस्कृतिक वैभव वाढवले आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळतच आपण मोठे झालो आहोत. मग तिला कसे विसरता येईल...


माधव ज्युलियन यांच्या शब्दात सांगायचे झाले तर


      मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे.


     नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे.


     हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, वसे आमुच्या हृन्मंदिरी.


     जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी.


ही नैतिक जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आहे. कारण आम्ही तिचे वारस आहोत.


    संस्कृत भाषेतून उगम पावलेली, प्राकृतापासून विकसित झालेली ही मराठी. सातवाहन राजांच्या काळापासून वापरात आली, यादव राजांच्या काळात ती भरभराटीस आली. अनेक संत, कवी, लेखकांनी तिला सुंदर लेणे चढवले. त्यातून ती अधिकच श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न होत गेली. विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. म्हणून ते आद्य कवी. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील ज्ञान भांडार मराठीत आणून सर्वसामान्यांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ आदी ग्रंथ लिहून मराठी भाषेला इतके सामर्थ्य प्राप्त करून दिले की खरोखरच ती ‘ अमृतातेही पैजा ‘ जिंकेल. आणि खरोखरीच इतकी सुंदर भाषा त्यांनी वापरली की ओवी असावी तर ज्ञानेशाची असे म्हटले जाऊ लागले. अखिल विश्वासाठी इतके सुंदर पसायदान ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत मागितले की ते मराठीचे एक अभिमानाचे अक्षर आणि अमर लेणे झाले.


    पुढे संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतानी नानाविध ग्रंथ लिहून मराठीला आणखी समृद्ध केले. शिवरायांच्या नेतृत्वाखाली ‘ मराठी पाऊल पुढे पडले.’ आणि मायमराठीला राजाश्रय लाभला, लोकाश्रय लाभला. मराठी भाषेला मराठी मातीचा गंध लाभला. अंगावर रोमांच उभे करणारे शूरवीरांचे पोवाडे लिहिले गेले, लावण्या लिहिल्या गेल्या. संत कवी, पंत कवी यांनी मराठीला समृद्ध केले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वा सावरकर, आगरकर, म. फुले, न्या. रानडे, लोकहितवादी, साने गुरुजी, विनोबा भावे आदींच्या साहित्याने मराठी भाषेला अधिक श्रीमंत केले.


    खान्देशच्या मातीत जन्मलेल्या बहिणाबाई, बालकवी आदींच्या कवितांनी तर रसिकांच्या मनावर कायमचे गारुड केले. अशिक्षित असलेल्या बहिणाबाई अहिराणीत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेल्या, तर बालकवींनी आपल्या कवितांमधून रंगांची आणि निसर्ग सौंदर्याची उधळण केली. आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, गो नि दांडेकर, ना सी फडके, मंगेश पाडगावकर, बा भ बोरकर, भा रा तांबे आदी कवी आणि लेखकांनी अक्षर मराठी साहित्य निर्मिती केली. मराठीतील वाल्मिकी म्हटल्या जाणाऱ्या ग दि माडगुळकर यांनी अक्षर अमर गीतरामायण लिहिले. केवढी थोर साहित्यिकांची मांदियाळी आहे मराठीत ! नावे तरी किती घ्यावीत ! अशा या वेगवेगळ्या कवी आणि लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे.


    तरी आज अशी वेळ का येते की आम्हाला म्हणावे लागते की मराठी भाषा जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे ? त्याचे कारण आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे वारस आहोत, तिचे पांग आम्हाला फेडायचे आहेत हे आम्ही कुठेतरी विसरतो. वर्षभरातून एकदा मराठी दिवस आला की आम्हाला मराठीचा अभिमान उरी दाटून येतो. पण पुन्हा वर्षभर गायब ! आमच्या मुलांना आम्ही अट्टाहासाने इंग्रजी शाळेत घालतो. मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत.


इंग्रजी भाषा म्हणून शिकणे आजच्या काळासाठी आवश्यक आहेच याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण यासाठी मातृभाषेचा बळी द्यायला हवा का याचा विचार आपण करणार आहोत की नाही ? मावशीसाठी आईचा बळी द्यायचा का ? आम्ही आमच्या मुलांना आता ‘ चिऊ काऊ ‘ नाही शिकवत. आमचा काऊ म्हणजे आता गाय. चिऊ म्हणजे sparrow. भू भू म्हणजे कुत्रा नाही. आता डॉगी म्हटले जाते.  ‘ आई ‘ म्हणुनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी. पण ती हाक आता नाही येत कानी. जिकडे तिकडे ‘ मम्मी शब्द कानावर पडतो. इंग्रजीत प्रेताला मम्मी म्हणतात. मम्मी म्हणताना ओठ मिटले जातात तर आई म्हणताना तोंड उघडले जाते. आ होतो. केवढा मोठा फरक ! ‘ टी व्ही वरच्या साबणाच्या एका जाहिरातीत एक छोटी मुलगी आपल्या आईला ‘ मम्मी ‘ म्हणून हाक मारते. आणि मग ‘ किती सुंदर आहे. She is so talented.’ मम्मी सुद्धा, रॉक स्टार सुद्धा असे इंग्रजाळलेले उद्गार कानी येतात. मोबाईलवर मराठी टाइप करताना मराठीचे जे काही खून पडतात ते तर भयानकच ! ऱ्हस्व, दीर्घ तर अजून पुढचा भाग...! त्याबद्दल मी इथे जास्त बोलत नाही.


    म्हणून आमच्या मुलांना आवर्जून मराठी शाळेत टाकले पाहिजे. त्यांना सुदर मराठी पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. त्यांची गोडी लावली पाहिजे. आधी आपण पालकांनी लावली पाहिजे. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी बोला, मराठी चाला, मराठी खा, मराठी प्या, मराठी झोपा, मराठी जागा, मी मराठी, बाणा मराठी, जात मराठी, पंथ मराठी, धर्म मराठी असे अंतर्बाह्य मराठीमय व्हा. आता होळी येते आहे. तेव्हा असा ‘ असा अवघा रंग एक झाला..’ पाहिजे. ती खरी होळी. असे जेव्हा होईल तेव्हा मराठी जगेल, वाचेल, वाढेल. फक्त मराठी दिन साजरा करून नाही भागणार.


    सुरेश भटांच्या ओळींनी शेवट करू या


          लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी


          जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी


          धर्म पंथ जात एक जाणतो मराठी


          एवढ्या जगात माय मानतो मराठी.



माय मराठी - राजश्री मानकर



माझ्या मराठीची गोडी अशी अवीट

का म्हणती राजभाषा येईल तुमच्या ध्यानी नीट

काना, मात्रा, उकार, वेलांटी यांसह सजलेली

पूर्ण विराम, स्वल्प विराम, इ. चिन्हांचा शृंगार करूनी भावनांनी ओथंबलेली

कुठला रस कधी योजावा

याचे अचूक आडाखे असलेली

बोलणाऱ्याच्या ह्रदयातूनी साद देणारी

ऐकणाऱ्याच्या ह्रदयास हात घालणारी

संतांची शिकवण ओव्या, कीर्तने, भारूडे यांतूनी

सहज मनावर बिंबवणारी

मायेच्या ममतेने हात देवूनी

पाऊल पुढे नेण्या झटणारी

माय मराठीचे कौतुक करावे तितुके थोडे

देश विदेशातही फडकवी संस्कृतीचे झेंडे

मराठीची बोली जैसी अमृतवाणी

सौंदर्य लेवूनी खुलवी लेखणी

अभिमाने करू जागर मराठी

राजभाषेचा करू एल्गार मराठी

कोटी - वनजा देव

 हनुमंताची कोटीच्या कोटी उड्डाणे फक्त आरतीत माहिती असणारी आमची पिढी आणि तशी कोटी उड्डाणे करून यानाने अवकाशमार्गे चंद्रावर,

मंगळावर पोहोचता येतं,हे अनुभवणारी आजची पिढी.सध्या आपण फक्त टी.व्ही.वर बघतो आहोत,

पण असं उड्डाण आपणही अनुभवू शकतो,असा विश्वास मात्र नक्की वाटायला लागला आहे.


अंकलिपी शिकायला लागल्यावर हजारही खूप वाटायचे.लाख म्हणजेही किती ते मोजताना एकावर किती शून्य द्यायची,असा विचार पडायचा.कोटी तर फारच दूरची गोष्ट.कोटीचा आणि आपला कधीही संबंध येणार नाही,ह्याची पक्की खात्रीच होती.पण बघता बघता घरांचे भाव हजारो,लाखो करत किमान एक कोटीपर्यंत कधी कसे गेले,ते कळलेच नाही आणि आता वाटतं,इथे बरेच जण कोट्याधीश आहेत की!


शाब्दिक कोट्यांशी आमची खरी ओळख आपले सर्वांचे लाडके भाई,पु.ल. देशपांड्यांमुळे झाली आणि जवळ जवळ दोन पिढ्यांना ह्या शब्दांनी कोट्यावधी वेळा हसविले आणि आयुष्य समृद्ध केले.म्हणून तर त्यांना "कोट्याधीश पु.ल."म्हणतो आपण.


एक कोटीचं आर्थिक मूल्यही आता फार वाटेनासं झालं आहे,इतका तो शब्द रोज कानावर पडतो आहे. "कौन बनेगा करोडपती" खेळ कोटीपर्यंत पोहोचलेली व्यक्ती क्षणात कशी खाली येते,हे दाखवते आणि सावकाश,स्थिरचित्ताने खेळत कोटीपर्यंत पोहोचता येते,हेही दाखवते.


कोटी आर्थिक असली तर तिचं महत्व प्रत्येकासाठी वेगळं असतं. शाब्दिक कोटी करण्याचा आनंद वेगळा असतो,ऐकण्याचा आनंद वेगळा असतो.

कोटी उड्डाणे करण्याचा आनंद फक्त विमानाच्या पायलटलाच समजत असतो.

कोटी जप,कोटी कोटी प्रणाम, मोजता येतात.पण कोटी कोटी सूर्यकिरणे,

आकाशातून बरसणार्या कोट्यावधी जलधारा कधी कोणी मोजल्या आहेत? तरी  आपण म्हणतोच ना! 

आपल्याकडे कोटी रु.ची संपत्ती नसली,तरी शाब्दिक कोटी वाचून,ऐकून किंवा स्वतः करून खळखळून हसू शकतो.आनंदाची देवाण घेवाण तर कोट्यावधीवेळा करू शकतो ना! ती तरी जरूर करावी.


            

कोटी - दुष्यंत देशपांडे ,कराड

कुणी कोटी केल्यावर 

 हास्याचे फवारे उडतात !

कुणी कोटी जिंकल्यावर 

आनंदाने उड्या मारतात !

 कोणी कोटी गमावल्यावर 

दुःखा वेगाने रडत बसतात !

तर कोणी कोटी जपा नी

 आराध्याच्या जवळ जातात !

 कोटी एकच पण तिची रूपे किती वेगळी

 देऊन जातात सुख ,दुःख आणि आत्मिक सुख !

 यातलं नेमकं आपल्याला काय हवंय

 हेच माणसाला कळत नाही !

 सगळा जन्म आनंद ,सुख ,समाधान 

शोधण्यात मिळवण्यात जातो 

पण हाती काहीच लागत नाही !

रडत जन्मलो तरी समाधानात जायचं असतं

 कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी वाईट तरी करायचं नसतं 

माणूस खरच चांगला होता म्हटलं पाहिजे राहिलेल्यांनी

असं वागून त्यांच्या डोळ्यात दोन थेंब तरी उरायचं असतं !!




किल्याचे मनोगत - विनय भास्कर चितळे

 महाराजांचे आम्ही होss किल्ले ।

मुघलांचे परतविले अनेक हल्ले ॥


स्वराज्याच्या गर्जना आम्ही ऐकल्या ।

आमच्या खांद्यावरून तोफा डागल्या ॥    


महाराजांची केली आम्ही सेवा ।

दिला तुम्हा स्वराज्याचा ठेवा ॥     


माय हिरकणीचे धाडस अनुभवले ।      

न्याय-व्यवस्था व राजवैभव पाहिले ॥


मावळ्यांची आम्ही ढालही बनलो ।

सर्व घडामोडींचे साक्षीदार ठारलो ॥   


आम्हीही आहोत अस्सल मराठमोळे ।

स्वामी रक्षणार्थ झेलले तोफ-गोळे ॥         

 

ढासळते बुरुज व पडक्या भिंती ।

अशी जरी आमची आज स्थिती ॥         


जीर्ण होऊनही एकच् आशा उरी ।

खात्री आहे तीही कराल तुम्ही पुरी ॥        


आता नवीन पिढीतील राजे येतील ।

साऱ्या जगावर भगवा फडकवतील ॥        


     🚩  हर हर महादेव  🚩

 


छत्रपती शिवाजी महाराज - सौ स्वाती कार्ले..

 


शहाजी राजे जिजाऊ च्या पोटी 

एक पुत्र जन्मला शिवनेरी 

शिवाई देवी वरून ठेवले नाव शिवाजी 

स्वप्न स्वतंत्र राज्याचे रुजवले मनी 


रामाची, नरसिंहाची ऐकवूनी कथा 

घडविले तसे त्यांच्या मना 

केले शास्त्रात राजनीतित पारंगत 

शिस्त, बुध्दी, चातुर्य 

गुणांनी घडविले अद् भूत 


आदिलशाही, निजामशाही 

डच, फ्रेंच,इराण्यांची पातशाही

नेस्तनाबूत करण्यास घडविले तयारीत 

शस्त्रात, आणि घोडेस्वारीत 

केले निपुण सर्व शक्तीत 



फौज सवंगडी मावळ्या सह

लहान वयात घेऊन शपथेसह

एक संघाने केली तयारी लढण्यास

शिस्त, शौर्य, कौशल्य नेतृत्वासह


गड किल्यांची केली निर्मिती 

गनिमी कावा धैर्या पोटी 

केली रणधुंद रणनीती 

रयतेस केले स्वतंत्र दिवस रात्री 


संयम , विवेक, आणि राष्ट्रभक्ती 

त्याला जोड शिस्त आणि मातृभक्ती 

गुण आदर्श त्यांचे जपुया 

शौर्य कथा पुढील पीढीस सांगुया...! 



पूल - वनजा देव

 पूल

रावणाच्या लंकेत जायला वानरांनी बांधला सेतू,

सीतामाईची सुटका करायला जाणे

एवढाच होता हेतू!


पण आज ,

जिकडे पहावे तिकडे

पूलच पूल चोहीकडे!

नदी,नाले वा असो लांबरुंद खाडी,

उभा राहतो रोज नवा पूल,

रस्त्या रस्त्यांवर आहेत

उड्डाणपूल!

वाहने धावती सुसाट

देऊन सार्यांना हूल!

शत्रुने करता उध्वस्त,

वा निसर्गकोपाने होता जमिनदोस्त

काही तासात पूल उभा करण्याचं

लष्कराकडे आहे कौशल्य!


पुलावरून धावती आलिशान गाड्या,

त्याच पुलाखाली घेती कोणी रात्रीचा आसरा!

तिथेच दिवसा चालविती कोणी

 बेघर मुलांसाठी शाळा!

पुलाखाली  जन्म

शेवटही तिथेच!

पुलाखाली काय घडतंय

वरच्या पुलाला नाही पडत फरक!

दुःख हेच आहे,की

वर आणि खाली धावणार्या दोन्ही जगांना

पुलाची आहे गरज,

पण दोघांमधली दरी जोडायला 

  नाही बांधला जात संवादाचा एक लहानसाही साकव!

मान्य आहे,प्रगतीसाठी,

भौतिक सुखासाठी निकड आहे नवे नवे पूल बांधण्याची,

पण आयुष्यातली एकटेपणाची दरी बुजवायला ,

गरज आहे

नात्यांमधल्या संवादसेतुंची!


   

पूल - प्रभाकर जोशी

ओलांडले आहेत
कधीच
हृदयाचे पूल जोडायचे राहिलेत 
जोडू शकू ते आपणच फक्त 

फक्त आपणासाठीच असेल तो
पूल आहे तसा नाजूक
चालू धीराने
पुलावरून चालताना किती मजा येते
पूल बांधले नसते तर अवघड होते जवळ येणे

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...