पूल
रावणाच्या लंकेत जायला वानरांनी बांधला सेतू,
सीतामाईची सुटका करायला जाणे
एवढाच होता हेतू!
पण आज ,
जिकडे पहावे तिकडे
पूलच पूल चोहीकडे!
नदी,नाले वा असो लांबरुंद खाडी,
उभा राहतो रोज नवा पूल,
रस्त्या रस्त्यांवर आहेत
उड्डाणपूल!
वाहने धावती सुसाट
देऊन सार्यांना हूल!
शत्रुने करता उध्वस्त,
वा निसर्गकोपाने होता जमिनदोस्त
काही तासात पूल उभा करण्याचं
लष्कराकडे आहे कौशल्य!
पुलावरून धावती आलिशान गाड्या,
त्याच पुलाखाली घेती कोणी रात्रीचा आसरा!
तिथेच दिवसा चालविती कोणी
बेघर मुलांसाठी शाळा!
पुलाखाली जन्म
शेवटही तिथेच!
पुलाखाली काय घडतंय
वरच्या पुलाला नाही पडत फरक!
दुःख हेच आहे,की
वर आणि खाली धावणार्या दोन्ही जगांना
पुलाची आहे गरज,
पण दोघांमधली दरी जोडायला
नाही बांधला जात संवादाचा एक लहानसाही साकव!
मान्य आहे,प्रगतीसाठी,
भौतिक सुखासाठी निकड आहे नवे नवे पूल बांधण्याची,
पण आयुष्यातली एकटेपणाची दरी बुजवायला ,
गरज आहे
नात्यांमधल्या संवादसेतुंची!
No comments:
Post a Comment